Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Live Update : माजी मंत्री अमित देशमुख यांच्यावर नाव न घेता संजय बनसोडे यांची टीका

Sarkarnama breaking Updates : 7 डिसेंबर 2025 च्या राज्य आणि देशातील महत्त्वाचे घडामोडी एकाच क्लिकवर...

सरकारनामा ब्यूरो

Amit Deshmukh : तुम्ही काठावर पास झाला आहात

माजी मंत्री संजय बनसोडे यांनी लातूरमध्ये एका भाषणात लातूरचे प्रिन्स उदगीरमध्ये येऊन सांगत आहेत, विकास काय मात्र आधी तुमच्या शहराचा विकास बघा, काय तुम्ही केले, म्हणून तुमचे मताधिक्य कमी झाले. माझ्या एवढा मताधिक्याने तुम्ही कधीही निवडून आलेले नाहीत. यावेळी तुम्ही काठावर पास झाला आहात. नाव न घेता काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांच्यावर घणाघाती टीका संजय बनसोडे यांनी केली आहे.

Assembly Session Update : मंत्रिमंडळाची बैठक सुरू

नागपूरमध्ये उद्यापासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम झाला. विरोधकांनी मात्र त्यावर बहिष्कार टाकला होता. चहापानानंतर आता मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे.

Assembly Session : इंडिगोच्या गोंधळाचा आमदारांनाही फटका

इंडिगो विमान कंपनीच्या गोंधळाचा नागपूरला विधिमंडळ अधिवेशनासाठी निघालेल्या आमदारांनाही फटका बसला आहे. आमदार आदित्य ठाकरे यांचे तिकीट रद्द झाले आहे. त्यामुळे ते दुसऱ्या कंपनीच्या विमानाने नागपुरला जाणार आहे. पुण्यातील आमदार हेमंत रासने व इतरांनाही फटका बसला आहे.

Assembly Session : मिटकरींनी दाखविला सरकारला आरसा

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. मात्र, दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते नसल्याने विरोधकांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही सरकारला आरसा दाखवला आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मजबूत विरोधी पक्ष आवश्यक आहे. सरकारवर नियंत्रण ठेवणारा घटक म्हणजे विरोधी पक्ष केवळ सत्ताधारी नव्हे तर मतभिन्नता असलेले विचार लोकशाहीला बळ देतात विरोधी पक्षाशिवाय संसद ही फक्त “मोहोर उमटवण्याची संस्था” बनते. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर), अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियात केली आहे.

BJP Politics : अभिजीत थरवळ यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती 

डोंबिवलीतील शिवसेनेचे युवा पदाधिकारी अभिजीत थरवळ यांच्या पक्षप्रवेशाला भाजपकडून स्थगिती देण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीच सोशल मीडियातून ही माहिती दिली.

Assembly Session Live : विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. विरोधकांकडून आयोजित पत्रकार परिषदेत सरकारवर हल्लाबोल चढविण्यात आला. आमदार विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव, अनिल देशमुख यांनी सरकार विरोधकांचा सन्मान राखत नसल्याची टीका केली.

काँग्रेसला धक्का, सई खराडे, शिवतेज खराडे, इंद्रजीत आडगुळे यांचा शिवसेनेत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोल्हापूरच्या माजी महापौर सई खराडे आणि शिवाजी पेठ प्रभागातून इच्छुक असणारे त्यांचे चिरंजीव शिवतेज खराडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत आडगुळे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला.

Latur Corruption : लातूरच्या चाकूर तालुक्यातील 41 गोठे गायब, चौकशीत धक्कादायक माहिती समोर

लातूरचा चाकूर तालुक्यातील कलकोटी इथं मनरेगाची कामे प्रत्यक्षात न करता निधी हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान या भ्रष्ट प्रकरणाची चौकशी वरिष्ठ समितीने जिओ टॅग लावून केल्याने केवळ एकच गोठासमोर आला, तर 41 गोठ्यांचा निधी काम न करता हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेषता, ज्या लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला त्यातील अनेक लाभार्थी हे शासकीय सेवेत कर्मचारी असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

Crime Update : गाडीला कट का मारला, दोन गटात रस्त्यावर तुफान राडा

गाडीला कट का मारला, या किरकोळ कारणावरून वसईत तुफान हाणामारी झाली. हाणामारीचा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. वसईच्या तुंगारेश्वर फाटा इथं ही घटना घडली. याप्रकरणात नालासोपारा पेल्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीत लाथा बुक्या, दांडके, लोखंडी रॉडचा वापर झाला.

Solapur Politics : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक; 16 जागांसाठी मतदान शांततेत सुरू

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 16 संचालक पदांच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून शांततेत आणि सुरळीत मतदान प्रक्रिया सुरू आहे.याआधीच व्यापारी मतदारसंघातून दोन जागा बिनविरोध निवडून आल्याने आता उर्वरित जागांसाठी प्रत्यक्ष लढत होत आहे.

Pandharpur Politics : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना सोलापूर जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही; युवासेनेचा इशारा

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही. नुकसान भरपाई मिळावी यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या युवासेनेने माळशिरस तालुक्यातील माळीनगर इथं रास्ता रोको आंदोलन केले. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. येत्या आठ दिवसात नुकसान भरपाई मिळावी अन्यथा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना सोलापूर जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा युवासेनेचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष गणेश इंगळे यांनी दिला आहे.

BJP Vs ShivsenaUBT : राज्य सरकारविषयी चुकीची माहिती पसवू नका; राणाजगजितसिंह पाटील यांनी ओमराजेंन सुनावलं

केंद्र सरकारच्या मदतीचा विचार न करता राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मदत केली. चुकीची माहिती पसरू नका, असे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना सुनावलं आहे. केंद्राच्या मदतीबाबत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एसडीआरएफ, एनडीआरएफच्या पलीकडे जाऊन राज्य सरकारने मदत केली. विरोधातील प्रतिनिधी अतिवृष्टीच्या अनुदानाबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत, असे राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटलं.

Eknath Shinde Shivsena : महापालिकेतील प्रत्येक प्रभागात शिवसेनेचे चार उमेदवार तयार; महायुतीत स्वबळाची तयारी

नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाने बैठका घेतल्या जात आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी युती होणार की, नाही अजून तरी स्पष्ट झाले नाही. त्यातच शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. महापालिकेतील प्रत्येक प्रभागात पक्षाचे चार उमेदवार तयार आहेत, असेही कल्याणकर यांनी म्हटलं.

MNS Vs BJP : वसई विरार पालिकेच्या निवडणुकीत भाजपचं पानिपत होणार : अविनाश जाधव

वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 24व्या कार्यालयाचे उद्घाटन मनसे नेते अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. याच कार्यक्रमात जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका करत, पालिकेच्या निवडणुकीत भाजपचा ‘पानिपत’ होणार, असा दावा केला आहे.

Pratap Sarnaik : उपमुख्यमंत्री पद रद्द करा ठाकरेंच्या मागणीवर मंत्री सरनाईक यांची प्रतिक्रिया

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री पद रद्द करण्याची मागणी केली आहे. यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी, उद्धव ठाकरे जे म्हणतील ते राज्य सरकार थोडी ना करणार आहे. आमचं बरं चाललं आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेसाहेब, अजितदादांना सर्वसामान्य जनतेने स्वीकारलेलं आहे. कोण काय म्हणतं, त्याकडे लक्ष न देता. आम्ही राज्याचा विकास कसा होईल, त्याकडे आम्ही लक्ष देत आहोत, असे सांगितलं.

Beed Crime : बीडच्या नांदगाव इथल्या ग्रामपंचायत शिपायास अमानुष मारहाण

बीडच्या गेवराई तालुक्यातील नांदलगाव इथल्या ग्रामपंचायतचा शिपाई जालिंदर सुरवसे याला गावातील आठ ते दहा जणांनी लाकडी दांडे व रॉडने जबर मारहाण केली. या मारहाणमध्ये सुरवसे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड इथल्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिलेची छेड काढण्याच्या आरोपातून ही मारहाण झाल्याचे समोर आलं असून, सुरवसे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे.

गोव्यात अग्नितांडव, मुख्यमंत्री सावंतांचे चौकशीचे आदेश

गोव्यात नाईट क्लबला लागलेल्या आगीमुळे २५ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी चौकशीचे आदेश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. नाईट क्लबच्या मालकाविरोधात अटक वाॅरंट जारी करण्यात आले आहे.

लोक सरकारला गुडघ्यावर आणतील - रोहित पवार

नाशिकच्या तपोवनामधील तब्बल १८०० वृक्षांचा जीव ‘संकटमोचका’कडूनच संकटात आला होता, पण आता ही वृक्षतोड करून प्रदर्शन केंद्र उभारण्याच्या टेंडरला स्थगिती दिल्याचं कळतंय. ही स्थगिती म्हणजे मग्रुर सरकारला पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते, सामान्य नागरीक आणि भाजप वगळता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी दिलेला दणका आहे. आतातरी सरकार शहाणं होईल आणि आपल्या लाडक्या कंत्राटदारांसाठी शेकडो झाडांची कत्तल करण्याचा निर्णय कायमचा रद्द करील, ही अपेक्षा! यापुढंही सरकार असंच वागत राहिलं तर लोकंच विषय हाती घेऊन सरकारला असंच गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाहीत, असा संताप रोहित पवार यांनी व्यक्त केला.

२४९ वाहनांवर कारवाई

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शालेय बस नियमावलीचे उल्लघंन करणाऱ्या वाहनांची १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत तपासणी करण्यात आली, या कारवाईत १ हजार ४६४ वाहनांची तपासणी करुन त्यापैकी २४९ वाहनांवर कारवाई करण्यात आली; यामाध्यमातून २२ लाख २२ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

गोव्यात नाईट क्लबला आग,23 जणांचा मृत्यू

गोव्यातील अर्पोरा येथे शनिवारी रात्री नाईट क्लबला भीषण आग लागली, या आगीत तब्बल 23 जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधा मोदी यांनी या घटनेनंतर ट्विट करत म्हटले की, आगीची दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो.

नाराजी दूर! रवींद्र चव्हाण-एकनाथ एकाच व्यासपीठावर आले

मागील काही दिवसांपासून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तणाव असल्याची चर्चा होती. कल्याण डोंबिवलीत फोडाफोडीच्या राजकारणामुळे शिंदे नाराज असल्याचे सांगितले जात होते. मात्र, शनिवारी सायंकाळी डोंबिवलीतील एका विकास कार्यक्रमाच्या निमित्ताने शिंदे-चव्हाण एकाच व्यासपीठावर आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT