Amit Ujagare
महाराष्ट्रात असा कोणीही नसेल ज्याला IAS अधिकारी तुकाराम मुंढे माहिती नसतील, त्यांची ख्यातीच अशी आहे की ते आपल्या कामामुळं सातत्यानं माध्यमांमध्ये आणि त्यामुळं जनतेमध्ये चर्चेत असतात.
एव्हाना आता मुंढेंचे चाहते असलेल्या नागरिकांना त्यांच्या कारकीर्दीबद्दलही बरीच माहिती आहे. मुंढेंच्या आत्तापर्यंतच्या २१ वर्षांच्या कार्यकाळात २५ वेळा बदल्या झाल्या आहेत. त्यांच्या कर्तव्यकठोर कार्यपद्धतीची खरंतर पावती आहे.
पण तुम्हाला हे माहिती नसेल की तुकाराम मुंढे असे एकमेव नव्हेत, कारण राजस्थानमध्येही एक संदीप वर्मा नावाचे IAS अधिकारी आहेत, ज्यांच्या ३३ वर्षांच्या कार्यकाळात तब्बल ३० वेळा बदल्या झाल्या आहेत. म्हणजेच सरासरी एक वर्षाहून कमी कालावधीसाठी त्यांनी प्रत्येक विभागात काम केलं आहे.
आपल्याकडं अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल या त्यांच्या कठोर कामामुळं वैतागलेल्या राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळं होतात, त्यांच्या वाईट कामांमुळं या बदल्या झालेल्या नसतात. त्यामुळं IAS संदीप हे कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून ओळखले जातात.
राजस्थान केडरचे प्रशासकीय अधिकारी असलेले संदीप वर्मा हे १९९३ च्या बॅचचे आएएस अधिकारी आहेत. आयआयटी दिल्ली इथून त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली असून अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठ लॉ स्कूलमधून गव्हर्नमेंट प्रोक्यॉरमेंट लॉ ची पदवी घेतलेली आहे.
राजकीय नेते, आमदार, खासदार आणि मंत्र्यांना देखील त्यांच्या थेट कारवाईची आणि निर्णयांची भीती वाटते. ज्याप्रकारे तुकाराम मुंढे धडाधड कारवाया करत सुटतात त्याप्रमाणं संदीप वर्मांचा भ्रष्टाचार अन् चुकीच्या काम उखडून टाकण्याचा धडाका असतो.
सध्या संदीप वर्मा हे राजस्थान सरकारच्या कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कारवायांचे अनेक किस्से राजस्थानात सांगितलं जातात.
महाराष्ट्रात संदीप वर्मा यांना राजस्थानचे तुकाराम मुंढे म्हणून ओळखलं जात आहे. बऱ्याच प्रमाणात मुंढेंसोबत त्यांचं साध्यर्म्य आहे.