Amit Ujagare
घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३५ वी जयंती आहे. बाबासाहेब हे धोरणकर्ते, समाजसुधारक, कायदेपंडीत, अर्थतज्ज्ञ, पत्रकार, राजकारणी असं चौफेर व्यक्तीमत्व होतं. यानिमित्त त्यांच्या राजकीय कार्याचा आढावा घेऊयात.
बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः तीन राजकीय पक्ष स्थापन केले होते. गरजेनुसार ते विसर्जित केले आणि नवे पक्ष स्थापन केले. सर्वप्रथम त्यांनी १९३६ मध्ये 'स्वतंत्र मजूर पक्षा'ची स्थापना केली होती. याला 'लोकराज्य'च्या अंकात भि. म. कौसल यांचा लेखाचा संदर्भ आहे.
या पक्षाची स्थापना करण्याला एक कायदा कारणीभूत ठरला होता, हा कायदा ब्रिटिश सरकारनं केला होता. त्यानंतर बाबासाहेबांनी भारतातील शेतकरी आणि मजुरांसाठी 'हा' पक्ष स्थापन केला.
पण हा राजकीय पक्ष जातीय आधारावर न उभारता तो राष्ट्रीय पातळीवरील असावा अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी शेतकरी आणि मजुरांची मोट बांधण्याचा निश्चय केला कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्पृश्य वर्ग कार्यरत होता.
बाबासाहेब आंबेडकरांनी तीनही गोलमेज परिषदांना हजेरी लावली होती. त्यासाठी त्यांना अनेकदा लंडनला जावं लागलं होतं, त्यावेळी ब्रिटनमधील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या 'मजूर पक्ष' याचे नेते, पदाधिकारी यांच्याशी त्यांचा परिचय झाला.
या पक्षाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आंबेडकरांनी १५ ऑगस्ट १९३६ रोजी ज्यामध्ये सर्व समाजाच्या लोकांचा समावेश असेल असा 'स्वतंत्र मजूर पक्ष' (Indipendent Labour Party) स्थापन केला.
पण यासाठी ब्रिटिशांनी भारतात स्थापन केलेला एक कायदा कारणीभूत ठरला. हा कायदा म्हणजे 'गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट'. हा कायदा लागू झाल्यानंतर १९३७ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या.
या निवडणुकांमध्ये आपलाही पक्ष असावा यासाठी त्यांनी 'स्वतंत्र मजूर पक्षा'ची योजना आखली होती. हा पक्ष १९४२ पर्यंत कार्यरत होता, त्यानंतर बाबासाहेबांनी शेड्युल कास्ट फेडरेशन हा नवा पक्ष २० जुलै १९४२ रोजी स्थापन केला. त्यानंतर ३० सप्टेंबर १९५६ मध्ये हा पक्ष विसर्जत करत आरपीआयची घोषणा केली.
पण हयात असताना त्यांना आरपीआय स्थापन करता आला नाही. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे सहकारी एन. शिवराज, यशवंत आंबेडकर, दादासाहेब रुपवते यांनी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूरमध्ये आरपीआयची स्थापना केली.