Rashmi Mane
प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY) सुरु होऊन दहा वर्षांहून अधिक काळ झाला आहे. या योजनेत लाखो लोकांना बँकिंगशी जोडण्यात आलं आहे.
आता या खात्यांची केवायसी (Know Your Customer) प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँक खातं उघडल्यानंतर दरवर्षी किंवा ठराविक कालावधीनंतर खातेदारांनी आपली माहिती अपडेट करणं गरजेचं असतं.
त्यामुळे ज्यांचं जनधन खातं आहे त्यांनी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांचं खातं बंद होण्याची शक्यता आहे.
प्रधानमंत्री जनधन योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना बँकिंग सुविधेशी जोडणं हा उद्देश होता. या खात्यांवर किमान शिल्लक रकमेचा नियम लागू नाही. तसेच खातेदारांना ओवरड्राफ्टची सुविधाही मिळते.
2014-2015 मध्ये उघडण्यात आलेल्या खात्यांची केवायसीची मुदत आता संपत आली आहे. केवायसी म्हणजे बँकेकडे आपली सध्याची माहिती अपडेट करणं गरजेच आहे.
यामध्ये नाव, पत्ता, फोटो आणि इतर ओळखपत्रांचा समावेश होतो. ही प्रक्रिया फसवणूक टाळण्यासाठी आणि बँकिंग सेवा सुरळीत ठेवण्यासाठी केली जाते.
जर केवायसी वेळेत पूर्ण केली नाही, तर खातं बंद होऊ शकतं. त्यामुळे सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम किंवा इतर सुविधांचा लाभ घेण्यात अडचण येऊ शकते.