Amit Ujagare
नेपाळमध्ये भीषण महापुराचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. हे सर्व खरे व्हिडिओ असून त्यामध्ये सध्याच्या घडीला तब्बल ४०० लोक बेपत्ता झाले आहेत. यांपैकी १०५ भारतीय पर्यटकांचा आणि भाविकांचा समावेश आहे.
नेपाळच्या आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात हा महापूर आला असून या भागात कुठलाही मोठा पाऊस झालेला नव्हता, किंवा ढगफुटीही झालेली नव्हती त्यामुळं याबाबत हवामान खात्यालाही कसलीही खबर नसताना ही घटना घडली आहे.
त्यामुळं सुरुवातीला सोशल मीडियावर महापुराचे व्हायरल झालेले व्हिडिओ खोटे किंवा बनावट अथवा AI जनरेटेड किंवा डिपफेक असावेत अशीच सर्वांना शंका होती. पण याबाबत नेपाळच्या पर्यटन बोर्टानं ही घटना खरी असून त्यात नेपाळसह परदेशातील पर्यटक बेपत्ता झाल्याचं अधिकृतरित्या सांगितल्यानं याचं गांभीर्य जगाला काळालं आहे.
पण कुठलाही पाऊस नसताना, हवामान खात्याला या प्रलयाची खबर नसताना अशी घटना घडलीच कशी? या प्रश्नाचं उत्तरंही आता समोर आलं आहे. एकामागून एक घडलेल्या काही पर्यावरणीय घटनांमुळं हा प्रकार घडला आहे.
अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण विभागानं तिबेट-नेपाळच्या सीमाभागात सकाळी ८.३७ वाजता ४.४ रिश्टर स्केलच्या भूंकपाचे धक्के जाणवल्याची नोंद केली आहे. या धक्क्यांमुळे हिमालयातील जे कमजोर बर्फाचे डोंगर होते ते कोसळले अर्थात हिमस्खलन झालं.
काठमांडू विद्यापीठातील प्रसिद्ध जलवायू अभ्यासक प्रा. रिजन भक्त कायस्थ यांच्या विश्लेषणानुसार, हिमस्खलनाचे हे भलेमोठे डोंगर ल्हेंदे नदीच्या मार्गात कोसळले, आणि त्यामुळं या नदीचा मार्गच बंद झाला. त्यामुळं सातत्यानं प्रवास सुरु असल्यानं नदीचा फुगवटा वाढला आणि वाढतच गेला त्यामुळं नदीच्या मार्गात पडलेल्या बर्फाच्या डोंगरांवर त्याचा प्रचंड दबाव वाढला.
या प्रचंड दबावामुळं ल्हेंदे नदीच्या मार्गातील हे डोंगरही फुटले त्यामुळं प्रचंड आवाजही झाला. त्यामुळं नदीच्या खालच्या भागामध्ये अत्यंत वेगानं एखाद्या महापुराप्रमाणं पाणी वाहायला सुरुवात झाली.
या महापुरामुळं नेपाळमधील भोटेकोशी नदीत हा प्रवाह मिसळला आणि त्या नदीच्या पाण्याची यात भर पडली आणि प्रचंड माचीच्या मलब्यासह नदीच्या पाण्यानं अत्यंत रौद्ररुप धारण करत तिच्या मार्गातील एक पूल आणि शेकडो इमारती गिंळकृत केल्या. सहाजिकच यात सापडलेली सर्व माणसं ही बेपत्ता झाली आहेत.
यानंतर आता हा महापुराचा जोर पुढे भारतातील नद्यांना येऊन मिळाला असून सध्या बिहार आणि उत्तर प्रदेशातील नद्यांना त्यामुळं भारतीय प्रशासनाकडून अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पण अद्याप भारतात त्याचा मोठा परिणाम दिसून आल्याची कुठलाही माहिती समोर आलेली नाही.