Amit Ujagare
१० जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्री २ वाजता डॉ. संग्राम पाटील यांना त्यांच्या कुटुंबियांसह मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं एअरपोर्टवरुन ताब्यात घेतलं. यामुळं एकच खळबळ उडाली आहे.
संग्राम पाटील हे गेल्या काही वर्षांपासून भारतातील मोदी सरकारच्या कारभारावर सातत्यानं टीका करत आहेत. त्यामुळं भारतात दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
पण संग्राम पाटील यांची इतकी चर्चा होण्याचं कारण काय? त्यांची नेमकी ओळख काय आहे? जाणून घेऊयात.
संग्राम पाटील हे व्यावसायानं मेडिकल डॉक्टर आहेत. पुण्याच्या बी जे मेडिकल कॉलेजमधून त्यांनी अनस्थेशियालॉजीमध्ये एमबीबीएस आणि एमडी केलं आहे. त्यानंतर त्यांनी लंडनमध्ये जाऊनही पुढील वैद्यकीय शिक्षण घेतलं.
युकेमधील FRCA- Royal College of Anesthetists त्यांना फेलोशिप मिळाली आहे. याच रॉयल कॉलेजमधून त्यांनी फॅकल्टी ऑफ पेन मेडिसिनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट फोलोशिप मिळवली.
तसंच स्वित्झर्लंड येथून युरोपियन सोसायटी ऑफ रिजनल अनेस्थेशिया अँड पेन थेरपी (ESRA) यांचा 'युरोपियन डिप्लोमा इन पेन मेडिसिन' (EDPM) हा डिप्लोमा केला आहे.
त्याचबरोबर युकेमधील कार्डिफ विद्यापीठातून त्यांनी पेन मेडिसिनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला आहे. तसंच हेल्थकेअर मॅनेजमेंटमध्ये डॉ. संग्राम पाटील यांनी एमबीए देखील केलं आहे.
डॉक्टरी पेशात असले तरी संग्राम पाटील हे लेखक आहेत, अनेक सामाजिक प्रश्नांवर ते लिहितात. भारतातल्या राजकीय परिस्थितीवरही ते बऱ्याचदा तुलनात्मक विश्लेषण करतात. त्याचबरोबर ब्लॉगर, व्याख्याते म्हणूनही ते ओळखले जातात.
संग्राम पाटील यांच मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील एरंडोल हे आहे. म्हणजेच खान्देशचे सुपुत्र म्हणून डॉ. संग्राम पाटील यांची ओळख आहे. पण सध्या ब्रिटनचं नागरिकत्व घेऊन आपल्या कुटुंबासह ते लंडनमध्ये स्थायिक झालेले आहेत.