Amit Ujagare
मराठी-हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर निशिकांत दुबे यांनी नुकतंच वादग्रस्त विधानं केलं आहे. महाराष्ट्राकडं काय आहे? मराठी नेत्यांना पटक पटक के मारेंगे असं विधान त्यांनी केलं आहे.
निशिकांत दुबे हे भाजपचे झारखंडमधील गोड्डा मतदारसंघातील खासदार आहेत. २००९ पासून २०२४ पर्यंत तीन निवडणुका ते सातत्यानं खासदार म्हणून निवडून आले आहेत.
दुबे यांनी अनेकदा वादग्रस्त विधान केली आहेत. आपल्या २००९, २०१४, २०१९ या तिन्ही निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात शैक्षणिक पात्रतेसंबंधी खोटे दावे केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. झारखंड हायकोर्टात २०२० मध्ये जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली होती.
एप्रिल २०२५ मध्ये दुबे यांनी देशाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यावर टीका केली होती. वक्फ कायद्यावरुन त्यांनी CJI हे देशात धार्मिक युद्ध आणि नागरी उठावाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला होता.
तसंच भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी यांच्यावरही त्यांनी अशीच वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यांना मुस्लिम आयुक्त असं त्यांनी संबोधलं होतं.
नुकतंच दुबे यांनी महाराष्ट्रातील भाषावादावर भाष्य केलं. हे करताना त्यांनी थेट मराठी माणसावर हल्ला चढवला, मराठी माणसानं आणि नेत्यांनी आमच्या राज्यांमध्ये येऊन दाखवावं. त्यांना पटक पटक के मारेंगे असं त्यांनी म्हटलं.
त्याचबरोबर महाराष्ट्रात काय आहे? तुम्ही कुठला टॅक्स भरता. कुठले उद्योग तुमच्याजवळ आहेत? सर्वकाही आमच्याच राज्यांमध्ये आहे. आमच्याकडं खाणी आहेत, निसर्ग संपत्ती आहे, उद्योग आहेत असंही त्यांनी म्हटलं.
रिफायनरी सध्या जी आहे ती गुजरातमध्ये आली आहे. सेमिकंडक्टरची इंडस्ट्री देखील गुजरातमध्ये आहे. उलट आमचं शोषण करुन तुम्ही टॅक्स पे करता, असंही दुबे यांनी म्हटलं आहे.