

Shivsena UBT News : राजकारणात नेहमी उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो. पक्षात तुमच्याकडे पद, सत्ता असेल तरच मागेपुढे फिरणाऱ्यांची गर्दी आणि मानमरतबा टिकून राहतो. पण एक पराभव वर्षानुवर्ष सत्तेच्या सोपानात बसलेल्या दिग्गज नेत्यांनाही जमिनीवर आणतो. असाच काहीसा अनुभव सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire) हे घेत आहेत.
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरवापसीवरून दोन दिवसांपूर्वीच खैरे यांचे पक्षातील दुसरे नेते अंबादास दानवे यांच्याशी खडाजंगी झाली होती. काल त्याच दानवे यांना शिवसेना भवनामध्ये वाढदिवसानिमित्त खैरेंना केक भरवावा लागला. तुझं माझं जमेना, अशी अवस्था असली तरी खैरे यांनी अंबादास दानवे यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा दिल्याच.
शिवसेनेचे शाखाप्रमुख, नगरसेवक, दोनवेळा आमदार, राज्यात मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, सलग चार टर्म खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरे यांच्या राजकीय कारकीर्दीला लोकसभा निवडणुकीतील सलग दोन पराभवाने काहीसी उतरती कळा लागली आहे.
शिवसेनेत कायम ज्या अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्याशी खैरे यांचे खटके उडायचे आणि अजूनही ते उडत आहेत, त्यांचे नेतृत्व स्वीकारण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. पक्षात खैरे-दानवे दोघेही नेते, अनुभवाने आणि वयानेही खैरे ज्येष्ठ आहेत. पण राज्यात शिवसेना पक्ष फुटीनंतर होणारी पडझड, लागलेली गळती रोखण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खैरे यांच्यापेक्षा दानवेंना झुकते माप दिले. संघटनात्म बांधणी, मराठवाड्यातील नेतृत्व, निवडणुकांची रणनिती या सगळ्या महत्वाच्या जबाबदाऱ्या अंबादास दानवे यांच्यावर सोपवण्यात आल्या.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर अंबादास दानवे हे केवळ छत्रपती संभाजीनगर किंवा मराठवाड्यापुरते मर्यादित राहिले नाही, तर ते राज्य पातळीवरचे नेते बनले. विरोधी पक्षाची भूमिका चोख बजावत अंबादास दानवे यांनी सत्ताधारी पक्षांना धारेवर धरत शिवसेनेची ताकद दाखवून दिली. या कामगिरीमुळे उद्धव ठाकरे यांचा दानवे यांच्यावरचा विश्वास अधिक बळावला आणि ते नेत्यांच्या रांगेत जाऊन बसले.
चंद्रकांत खैर यांची पक्षनिष्ठा, शिवसेना वाढीसाठी त्यांनी घेतलेले कष्ट याची जाणीव ठेवत उद्धव ठाकरे यांनीही खैरेंचा योग्य सन्मान राखण्याचे प्रयत्न केले. परंतु शेवटी संघटना टिकवणे आणि ती वाढवणे यात अंबादास दानवे यांना जादा अधिकार देण्यात आले. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देण्याची आक्रमक भूमिका दानवे यांनी स्वीकारली.
यातून राजू शिंदे, दिनेश परदेशी, सुरेश बनकर, भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर या भाजप आणि राष्ट्रवादीतील स्थानिक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात आणत त्यांनी बेरजेचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. कालांतराने यातील सगळेच नेते निवडणुकीतील पराभवानंतर तर कोणी उमेदवारी न मिळाल्यामुले आधीच पक्ष सोडून गेले होते.
दरम्यानच्या काळात यावरून खैरे-दानवे यांच्यात अनेकदा खटके उडाले, कधी ते मातोश्रीच्या दरबारापर्यंतही पोहचले. पण प्रत्येकवेळी दानवेंना झुकते माप आणि खैरेंना न दुखावण्याच्या सूचना देत या दोन्ही नेत्यांना माघारी धाडण्यात आले. खैरे-दानवे यांच्यात नवा आणि ताजा वाद झाला तो शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुन्हा पक्षात घेण्याच्या दानवे यांच्या प्रयत्नावरून.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाला आणि एमआयएमचा महाराष्ट्रातील एकमेव खासदार निवडून येण्यास हर्षवर्धन जाधव जबाबदार ठरले होते. आता त्याच जाधव यांच्यासाठी अंबादास दानवेंकडून पायघड्या घातल्या जात असल्याने खैरेंचा तिळपापड होणे सहाजिक होते. खैरेंनी संताप व्यक्त केला, जाधव यांचा प्रवेश होऊ देणार नाही, असेही सांगितले.
पण खैरे यांच्या या त्रागावर अंबादास दानवे यांनी हा निर्णय माझा नाही, मी कोणत्याही गोष्टी मनाने करत नाही. उद्धव ठाकरे यांच्या सूचनेशिवाय हे शक्य आहे का? चंद्रकांत खैरे यांनी त्यांचे मत व्यक्त केले, त्यांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण माझ्यासाठी खैरे यांच्या मतापेक्षा उद्धव ठाकरेंचा विचार महत्वाचा आहे, असे सांगत खैरेंची कोंडी केली.
शौर्यदिनाच्या महाआरतीवेळी माध्यमांनी खैरे-दानवे यांच्यातील वादाचा अनुभव पुन्हा एकदा घेतला. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आता वारे उलट्या दिशेने म्हणते दानवे यांच्या दिशेने वाहू लागले आहेत. खैरे यांनाही याची जाणीव आता होऊ लागली आहे. त्यामुळे यापुढे ते फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेतच दिसतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.