
Jalna Maratha Andolan News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमूदत उपोषणास बसलेल्यांवर लाठीमार करीत त्यांचे आंदोलन पोलिसांनी शुक्रवारी जालना जिल्ह्यात चिरडून टाकले. त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असून पोलिसी बळाचा आणि राज्य सरकारचाही निषेध होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी त्यावरून राज्यातील खोके सरकारच्या राजीनाम्याची मागणी शनिवारी केली.
महाराष्ट्रातील (Maharashtra) कावेबाज सरकारने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे जाणूनबुजून धिंडवडे काढले आहेत. त्यामुळे राजीनामा देत त्यांनी सत्ता सोडावी, अशी मागणी त्यांनी केली. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी ते सरकारी यंत्रणांचा गैरवापर करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
वारकऱ्यांवर लाठीहल्ला, कोकणी भूमीपुत्रांवर लाठीहल्ला आणि आता मराठा आरक्षण आंदोलकांवर लाठीहल्ला झाल्याचे सांगत महिलांचा वारंवार होणारा अपमान, अत्याचार, हिंसा, ह्यामुळे निर्माण झालेला महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न, वारंवार उसळलेल्या दंगली, कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस आणि धरपकड पाहता महाराष्ट्रात चाललेय काय ? गृहमंत्री आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री काय करीत आहेत ? असा सवाल त्यांनी केला आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आणि इतर मागण्यासाठी उपोषण सुरू होते. या उपोषण करत्यांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना अंबड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.