
'नाशिक : राज्य शासनाने 2017 मध्ये अध्यादेश काढून गाईच्या दूधाला सत्तावीस रुपये प्रति लिटर भाव द्यावा असे जाहिर केले होते. या कालावधीत दूध संघांनी मात्र कमी दर देऊन राज्यातील शेतकऱ्यांची आठ हजार कोटींची लुट केली आहे. सरकारने या दूध संघावर कारवाई करुन शेतकऱ्यांचे पैसे मिळवून द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी आज मुख्यंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. तसेच येथील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. ते म्हणाले, कोरोनाच्या महामारीतून लोकांची लवकर सुटका होईल असे सध्याचे चित्र नाही. राज्यातील, शहरांतील उद्योगधेदे बंद झालेले आहेत. अशा परिस्थितीत या कालावधीत शेतकऱ्यांनी आपला व्यवसाय नेटाने सुरू ठेवला आहे. दूध, फळे, भाजीपाला, अन्नधान्य आदी जीवनाश्यक वस्तूंचे उत्पादन व पुरवठा सुरळीत सुरू आहे. यामध्ये व्यापारी व विशेषतः दूध संकलन करणाऱ्या खाजगी व सहकारी संस्था शेतकऱ्यांची लूट करीत आहेत.
श्री. पाटील म्हणाले, राज्य सरकारने 19 जून 2017 मध्ये अद्यादेश काढून गाईचे दूद 27 रुपये प्रति लिटर दराने खरेदी करावे असे स्पष्ट केले होते. त्यानंतर 27 सप्टेबर 2018 म्हणजेच पंधरा महिन्यांनी 25 रुपये प्रति लिटर दर देण्याचे आदेश काढले. या मधल्या काळात कायद्याप्रमाणे जुना आदेश लागू होता. मात्र दूध संकलन करणाऱ्या खाजगी व सहकारी संस्थांनी दुधाच्या बिलांच्या फरकाची रक्कम आढ हजार 370 कोटी रुपये होते. या काळात या संस्थांनी शेतकऱ्यांना पंचवीस रुपयांपेक्षा कमी दर दिला. प्रत्यक्षात शहरात त्यांनी दूध विक्री 42 ते 52 रुपये प्रति लिटर दराने केली आहे. दुधाची पावडर तीनशे रुपये प्रति किलो दराने विक्री केली. यामध्ये शेतकऱ्यांची लूट झाली. अशा प्रकारे शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या सहकारी संस्थांवर सरकारने फौजदारी कारवाई करावी. तसेच आठ हजार 370 कोटी रुपये वसुल करुन शेतकऱ्यांना द्यावे. सरकारचे आदेश न पाळणाऱ्या या सहकारी दूध संघांवर कारवाई झालीच पाहिजे.
निवेदनात म्हटले आहे, की भारतीय जनता पक्षाच्या आग्रहाखातर करण्यात आलेला गोवंश हत्या बंदी कायदा ताबडतोब रद्द केला पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर, (कै) यशवंतराव चव्हाण, शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी गाय हा उपयुक्त पशू आहे, अशी भूमिका घेतली होती. मात्र सरकारच्या कायद्याने शेतकऱ्यांच्या बैलांच्या किमती ढासळल्या आहेत. त्याचा शेतकऱ्यांना त्रास होत आहे. गाय हा पाळीव प्राणी आहे. त्यामुळे हे कायदे रद्द करावेत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतांना शेतकरी संघटनेचे नाशिकचे अध्यक्ष, माजी नगरसेवक केशवराव पाटील, नाशिक तालुका अध्यक्ष सदाशिव नाईक आदी उपस्थित होते.
...
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.