Deepak Kulkarni
एकेकाळी आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू शिलेदार व तरुण तडफदार चेहरा असलेल्या खासदार राघव चड्ढा उपनेतेपदावरून हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
'आप'ने राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहून चड्ढा यांना राज्यसभेतील पक्षाच्या उपनेतेपदावरून तातडीनं हटवण्याची विनंती केली आहे. त्यांच्या जागी आता पंजाबमधीलच दुसरे खासदार अशोक मित्तल यांची वर्णी लावण्याचा प्रस्ताव पक्षानं दिला आहे.
इतकंच नव्हे तर, चड्ढा यांना यापुढे राज्यसभेत बोलण्यासाठी 'आप'च्या निर्धारित कोट्यातून वेळ दिला जाऊ नये, असंही आपनं पत्रात म्हटलं आहे. आपच्या या तडकाफडकी निर्णयामागं चड्ढा यांचं भाजपशी वाढती जवळीक मानलं जात आहे. आणखीही चार प्रमुख कारणं असल्याची चर्चा आहे.
स्वाती मालिवाल प्रकरण देशभरात गाजत असताना राघव चड्ढा हे आम आदमी पक्षापासून अंतर राखून होते.
दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया तुरूंगातून सुटल्यानंतर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, कोणतेही ट्विट केले नव्हते.
गेल्या काही दिवसांत चढ्ढा यांनी रिचार्ज कंपन्या, पॅटर्निटी लिव्ह यांसारखे मांडलेले मुद्दे चर्चेचे ठरले होते. पण आपच्या इतर खासदारांना त्यांच्यामुळे बोलण्याची संधी कमी मिळाल्यानं नाराजी व स्वतःचा पीआर वाढवत असल्याची टीका केली जात होती.
आम आदमी पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून राघव चड्ढा यांना वगळण्यात आलं होतं. कारण खासदार झाल्यानंतर त्यांची बदलेली वागणूक पक्ष नेतृत्वाला आधीच खटकली होती.
आम आदमी पक्ष अडचणीत असताना चड्ढा अन् महत्त्वाच्या नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला होता. तसेच संसदेत कोणते मुद्दे उपस्थित करावेत आणि त्यांना दिलेल्या वेळेत किती वेळ बोलावे, यावर चड्ढा यांनी कोणाशीही चर्चा केली नसल्याचं बोललं जात आहे.
आपची जंतर-मंतरवरील रॅली आणि अरविंद केजरीवाल यांच्या मोठ्या पत्रकार परिषदेसह इतरही अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये खासदार राघव चड्ढा हे सार्वजनिक मंचांवर किंवा सोशल मीडियावर पक्षासोबत उभे असल्याचं समोर आलं नव्हतं.