Deepak Kulkarni
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे.
राज्य सरकारकडून मराठा समाजासाठीच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटींचा निधी दिल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात महामंडळासाठी एकूण 750 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यात सरकारकडून पहिल्या टप्प्यात 150 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपासह विविध मागण्यांसाठी आंदोलनाची साद घातली आहे.
मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला अंतरवाली सराटी येथे एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. आंदोलनानं वातावरण तापण्याआधीच सरकारनं हा निधी दिल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.
मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अनेक योजना राबवत असते. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांसाठी हे महामंडळ आर्थिक आधार बनलं आहे.
महायुती सरकारनं सुरू असलेल्या 2025-26 या आर्थिक वर्षात 750 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली असून 300 कोटींच्या निधीचं वर्गीकरणही करण्यात आला आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे महाराष्ट्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेले एक महत्त्वाचे महामंडळ आहे.
या महामंडळाचा हेतू हा मराठा समाजातील तरुणांना व्यवसायात भरारी घेण्यासाठी आर्थिक मदत करणे आहे. महामंडळामार्फत वैयक्तिक व्यवसायासाठी 15 लाखांपर्यंत आणि गटप्रकल्पासाठी 50 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.