Rashmi Mane
गेल्या काही दिवसांत राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पिकांचे, घरांचे तसेच जनावरांचेही नुकसान झाल्याने शासनाकडे मदतीची अपेक्षा आहे. अशावेळी नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पंचनाम्याची प्रक्रिया महत्त्वाची ठरते.
पंचनामा म्हणजे झालेल्या नुकसानीची अधिकृत नोंद. महसूल विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतात.
किती नुकसान झाले आहे याची माहिती कागदोपत्री करतात. हाच पंचनामा पुढे शासनाकडे भरपाईसाठी आधार म्हणून दिला जातो.
अतिवृष्टी किंवा पुरानंतर संबंधित गावातील तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक असे अधिकारी गावात भेट देतात. शेतात उभ्या पिकांचे नुकसान किती झाले आहे, शेतजमिनीवर गाळ बसला आहे का, घरांचे किंवा मालमत्तेचे नुकसान झाले आहे का, याची पाहणी केली जाते.
शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांची माहिती घेतली जाते. त्यानंतर पंचनाम्यात पीकाचे नाव, टक्केवारीत नुकसान, क्षेत्रफळ, शेतकऱ्याचे नाव, सर्वे नंबर अशा नोंदी केल्या जातात.
पंचनाम्यात शेतकऱ्याचे संपूर्ण तपशील, जमिनीचा आकार, पीक कोणते होते, त्याची किती टक्के हानी झाली, घर अथवा जनावरांचे नुकसान झाले का, हे सर्व स्पष्टपणे लिहिले जाते. अधिकारी फोटो आणि व्हिडिओद्वारेही पुरावे जतन करतात.
यानंतर हा पंचनामा तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला जातो. जिल्हा प्रशासन शासनाला अहवाल सादर करते आणि त्यावरून मदत जाहीर केली जाते. नुकसानाचे प्रमाण अधिक असल्यास शासन विशेष मदत पॅकेज देऊ शकते.
शेतकऱ्यांसाठी पंचनामा ही प्रक्रिया महत्त्वाची आहे कारण त्यावरच त्यांना मिळणारी आर्थिक मदत ही आधार ठरते.