Deepak Kulkarni
राज्यातला सगळ्यात संवेदनशील ठिकाण असलेल्या मंत्रालयात प्रवेश केल्यानंतर यापूर्वी काही गैरप्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे मंत्रालयात मोठी खळबळ उडाली होती.
काही आंदोलकांनी तर मंत्रालयातील जाळीवर उड्या घेतल्याचेही अनेकदा दिसून आले आहेत. त्यामुळे मंत्रालयातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ लागले होते.
मंत्रालयातील हे प्रकार रोखण्यासाठी आता नवी सुरक्षा प्रणाली निर्माण करण्यात आली आहे. त्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात चेहरा ओळख आधारित प्रवेश प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली होती. यावेळी टप्पा 2 अंतर्गत प्रवेशासाठी ‘व्हिजीटर मॅनेजमेंट सिस्टीम’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
मंत्रालयात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना यापुढे कोणत्याही कामाकरिता प्रवेश हवा असल्यास त्यांना ‘डिजीप्रवेश’ या ऑनलाईन ॲप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे.
अभ्यांगतांना मंत्रालयाच्या ज्या विभागात कामानिमित्त प्रवेश आवश्यक आहे. फक्त त्यांना देण्यात आलेल्या वेळेत आणि परवानगी असलेल्या मजल्यावरच प्रवेश करता येणार आहे. अनधिकृत मजल्यावर प्रवेश केल्यास त्या व्यक्तीवर कारवाई होणार आहे.
मंत्रालयात आलेल्या व्यक्तीचे त्या विभागातील आपले काम पूर्ण झाल्यावर दिलेल्या वेळेत मंत्रालयातून बाहेर पडावे लागणार आहे.
ज्येष्ठ नागरीक व दिव्यांगांना रांगेत उभे राहण्यामुळे होणारा त्रास लक्षात घेता त्यांना दुपारी 12 वाजता प्रवेश देण्यात येणार आहे. तर दुपारी 12 नंतर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अभ्यांगत यांच्यासाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था राहील.
मंत्रालयात येणाऱ्या सर्व अभ्यागतांना दुपारी २ वाजेनंतर प्रवेश देण्यात येणार आहे. मंत्रालयात प्रवेशासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड आदी ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. अशिक्षित तसेच स्मार्टफोन नसलेल्या व्यक्तींना गार्डन गेट येथे ऑनलाईन ॲप आधारीत प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेश नोंदणीकरीता तसेच मदतीकरिता एक खिडकी उपलब्ध असणार आहे.