शर्मिला वाळुंज
स्वातंत्र्य दिनानिमित्त डोंबिवलीत तिरंगा रॅलीत सुमारे ३५ हजार चौरस फुटांचा विशाल तिरंगा हजारो नागरिकांनी हातात घेऊन रॅली काढली.
डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि डोंबिवलीतील १०० हून अधिक सामाजिक संस्थांच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन केले होते.
सुमारे १० हजारांहून अधिक विद्यार्थी व नागरिकांच्या सहभागातून झालेल्या या उपक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया , आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यामध्ये अधिकृत नोंद करण्यात आली.
‘तिरंगा हाती घेऊया, विश्वविक्रम घडवूया’ या संकल्पनेतून आयोजित रॅलीला मुसळधार पावसातही डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
डोंबिवली पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक (घरडा सर्कल) येथील हुतात्मा कॅप्टन विनयकुमार सचान स्मारकाला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली.
रॅलीचा समारोप दत्तनगर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यान परिसरातील १५० फूट उंच राष्ट्रध्वज स्तंभाजवळ झाला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नसून देशाची एकता, अखंडता, त्याग आणि अभिमानाचे प्रतीक आहे. एका विशाल तिरंग्याखाली हजारो नागरिकांचे एकत्र येणे ही डोंबिवलीच्या सामाजिक एकतेची ताकद असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.