Rajanand More
भारताचे माजी यष्टीरक्षक फारुख इंजिनिअर यांना ५३ वर्षांपूर्वी म्हणजेच १९७३ मध्ये केंद्र सरकारकडून पद्मश्री हा नागरी पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र, तेव्हापासून आजपर्यंत हा पुरस्कार आपल्याला प्रत्यक्ष मिळालाच नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आपली १९७३ मध्ये पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाल्याची माहिती वृत्तपत्रांतून समजल्याचे त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. त्यावेळी ते भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये मैदान गाजवत होते.
क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा सुरू असताना संघव्यवस्थापक हेमू अधिकारी यांनी पुरस्काराची माहिती दिली होती. त्यानंतर सर्वांनी आपले अभिनंदनही केल्याची आठवण इंजिनिअर यांनी सांगितली.
केंद्र सरकारकडून पुरस्काराबाबत अधिकृत पत्र मिळेल, असे त्यावेळी हेमू अधिकारी यांनी सांगितले होते. पण ते पत्र आजतागायत मिळाले नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.
फारुख इंजिनियर यांचे नाव पद्म पुरस्कारांच्या अधिकृत संकेतस्थळावरील १९७३ सालच्या पुरस्कारप्राप्तांच्या यादीतही आहे. मात्र, प्रत्यक्ष त्यांचा सन्मान झाला का, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
आपण अजूनही पद्मश्री पुरस्कार मिळावा, याची वाट पाहत असल्याचे इंजिनिअर यांनी सांगितले. ते सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहेत.
जय शाह यांना याबाबत पत्र लिहिल्याचेही त्यांनी मुलाखतीत सांगितले. शाह यांनी मागील महिन्यात याबाबत मदत करू, असे आश्वासन दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली. आता बीसीबीआयकडूनच याबाबत पावले उचलली जाणार असल्याची चर्चा आहे.
फारुख इंजिनिअर हे भारताकडून १९६१ ते १९७५ या कालावधीत क्रिकेट खेळले. ते उत्तर विकेटकीपर आणि फलंदाज होते. त्यांनी ४६ कसोट्यांमध्ये २ हजार ६११ धावा केला आहेत.