Deepak Kulkarni
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी विजयासाठी कंबर कसली आहे.
या महापालिका निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी युती-आघाडीसह स्वबळाचाही नारा दिला आहे. सर्वच महापालिकांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे.
महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगानं नियमांमध्ये एक दिलासादायक बदल केला आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना उमेदवारांकडे अर्ज करताना सादर करावयाची विविध शपथपत्रे आणि घोषणापत्रे आता मराठीतच असावीत, असा आग्रह धरता येणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
उमेदवारांना आता त्यांची कौटुंबिक,शैक्षणिक,संपत्तीसह इतर कोणतीही कागदपत्रे मराठी किंवा इंग्रजी यांपैकी सोयीच्या भाषेत सादर करता येणार आहे.
यावेळी उमेदवारांची भाषा संदर्भातील अडचण दूर होण्यास मदत होणार आहे. पण उमेदवारी अर्जासोबत सादर करावयाची शपथपत्रांमध्ये काही चुकीची माहिती निदर्शनास आल्यास किंवा लपवल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते.
निवडणूक आयोगाच्या नव्या सूचनांमुळे उमेदवारांना आपली सर्व माहिती बिनचूकपणे देणं सोपं जाणार आहे.
शहरी राजकारणाचा थेट कौल देणाऱ्या या निवडणुकांकडे राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागलं आहे.
राज्य निवडणूक आयोगानं या निवडणुकांसाठी काही नियमांबाबत लवचिकता दाखवत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया किचकट ठरणार नाही,याची काळजी घेतली आहे.