Rashmi Mane
बिहारमधील कुमार अनुराग यांची कहाणी अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. शाळा आणि महाविद्यालयात अपयशाचा सामना करूनही त्यांनी हार मानली नाही. सातत्यपूर्ण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी UPSC परीक्षा दोनदा उत्तीर्ण करत IAS पद गाठले.
कुमार अनुराग यांचे प्राथमिक शिक्षण बिहारमधील कटिहार येथे हिंदी माध्यमाच्या शाळेत झाले. त्यांचे बालपण सामान्य वातावरणात गेले. मात्र, पुढे आयुष्यात मोठे काहीतरी करण्याचे स्वप्न त्यांनी कायम जपले.
आठवीत असताना त्यांचा प्रवेश इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झाला. अचानक बदललेल्या भाषेमुळे अभ्यास समजण्यात अडचणी आल्या. सुरुवातीला संघर्ष करावा लागला, पण त्यांनी चिकाटी सोडली नाही आणि दहावीत 90% गुण मिळवले.
बारावीच्या प्री-बोर्ड परीक्षेत अनुराग गणित विषयात नापास झाले. हा त्यांच्या आयुष्यातील मोठा धक्का होता. मात्र त्यांनी निराश न होता चुका सुधारल्या आणि अंतिम परीक्षेत एकूण 94% गुण मिळवत दमदार पुनरागमन केले.
उत्कृष्ट गुणांमुळे त्यांना दिल्लीतील प्रतिष्ठित SRCC महाविद्यालयात प्रवेश मिळाला. मात्र पदवीच्या दुसऱ्या वर्षात ते काही विषयांत नापास झाले. हे अपयशच त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे ठरले.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली. स्वतःच्या कमतरता ओळखून त्यांनी नियोजनबद्ध अभ्यास केला. नियमित सराव आणि मॉक टेस्टवर त्यांनी विशेष भर दिला.
2017 मध्ये अनुराग यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांना अखिल भारतीय 677 वी रँक मिळाली. मात्र त्यांचे अंतिम लक्ष्य IAS बनण्याचे असल्याने ते यावर थांबले नाहीत.
2018 मध्ये त्यांनी पुन्हा UPSC परीक्षा दिली. अधिक मेहनत आणि अचूक रणनीतीच्या जोरावर त्यांनी अखिल भारतीय 48 वी रँक मिळवली आणि IAS अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार केले. त्यांची कहाणी सांगते की अपयश हा शेवट नसून यशाकडे जाणारा पहिला टप्पा असतो.