Deepak Kulkarni
गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय,आक्रमक आणि जनमानसात 'लोकनेते' म्हणून तर भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते होते.
तळागाळातील, विशेषतः वंजारी समाज आणि मागासवर्गीयांच्या हक्कासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. पण त्यांचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाला होता.
मुंडे यांच्या अपघाती मृत्युनंतर महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागामार्फत 'गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना' राबवली जाते.
या योजनेचा मुख्य हेतू हा शेती व्यवसाय करताना किंवा इतर कोणत्याही अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास किंवा त्याला अपंगत्व आल्यास त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा आधार देणे हा आहे.
राज्य सरकारच्या 'गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत' अपघाताच्या स्वरूपानुसार पात्र लाभार्थी कुटुंबाला सानुग्रह अनुदान दिले जाते.
या योजनेत अपघाती मृत्यू झाल्यास किंवा दोन डोळे / दोन हात / दोन पाय निकामी झाल्यास 2 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते. मात्र, अपघातानंतर ४५ दिवसांच्या आत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अपघाताची नोंदणी करणे बंधनकारक आहे
शेती व्यवसाय त्यात विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्ती तसेच रस्ते वाहन अपघात यांसह इतर कोणत्याही कारणांमुळे होणाऱ्या अपघातांसाठी ही योजना लागू होऊ शकते.
या सर्व अपघातांमध्ये अनेकदा शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते. त्यांच्या कुटुंबियांवर अचानक दु:खाचा डोंगर कोसळतो,आर्थिक संकट ओढावते. अशावेळी ही योजना मोठा आधार ठरू शकते.
या योजनेसाठी ७/१२ उतारा आणि ६-क, ६-ड फेरफार, एफ.आय.आर. (FIR) आणि घटनास्थळाचा पंचनामा,शवविच्छेदन अहवाल, वारसदाराचे आधार लिंक असलेले बँक खाते पुस्तक, मृत्यूचा दाखला किंवा अपंगत्वाचा अधिकृत वैद्यकीय दाखला ही कागदपत्रे आवश्यक आहेत.