Rashmi Mane
देशातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) आज सर्वाधिक लोकप्रिय योजनांपैकी एक आहे.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये त्यांच्या खात्यात जमा केली जाते. मात्र, एका कुटुंबातील फक्त एका सदस्यालाच या योजनेचा लाभ घेण्याचा नियम आहे.
पण आता केंद्र सरकारच्या तपासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. देशभरात तब्बल 17 लाख प्रकरणांमध्ये पती-पत्नी दोघांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.
ही माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने केलेल्या तपासात समोर आली आहे.
याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना पत्र पाठवून दुहेरी लाभ घेणाऱ्या कुटुंबांची सखोल चौकशी आणि व्हेरिफिकेशन करण्याचे निर्देश दिले आहेत.
सरकारी आकडेवारीनुसार, एकूण 31.01 लाख प्रकरणांपैकी 19.2 लाख लाभार्थ्यांचे व्हेरिफिकेशन पूर्ण झाले आहे. त्यामध्ये 17.87 लाख प्रकरणांमध्ये पती-पत्नी दोघेही लाभार्थी असल्याचे आढळले आहे.
राज्य सरकारांना या बाबत उत्तर देण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. अशा लाभार्थ्यांविरोधात सरकार कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. मात्र, नेमकी शिक्षा काय असेल, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, शेतकऱ्यांना PM Kisan योजनेच्या 21व्या हप्त्याची वाट लवकरच संपणार आहे. सरकारने नुकत्याच आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि जम्मू-कश्मीरमधील 8.5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना 21वा हप्ता आधीच वितरित केला आहे.
मात्र, इतर राज्यांतील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठी दिलासादायक घोषणा होण्याची शक्यता आहे.