Jagdish Patil
मुंबईतील घाटकोपर त्यानंतर दादरमधील 'शिवतीर्थ' परिसरात जैन साधूंसाठी आखण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून वाद निर्माण झाला आहे.
मनसेने याविरोधात आक्रमत पवित्रा घेतला असून हा प्रकार सांस्कृतिक दहशतवाद असल्याची टीका केली आहे.
तर जैन समाजाने त्यांच्या साधूंना अनवाणी चालताना पायाला चटके लागू नयेत म्हणून ही पट्टी आखल्याचं सांगितलं आहे.
शिवाय मागील 5 ते 6 वर्षांपासून अशी व्यवस्था केली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
याच पार्श्वभूमीवर जैन मुनी अनवाणी (पायात चपला किंवा बूट न घालता) का चालतात? ते जाणून घेऊया.
जैन धर्मात साधू आणि साध्वींचे पायी चालणे (विहार करणे) हा त्यांच्या कठोर आध्यात्मिक जीवनशैलीचा एक मुख्य भाग आहे.
जैन धर्मात अहिंसेला खूप महत्व असल्यामुळे चालताना पायाखाली जमिनीवरील कीटक, मुंग्यासारख्या जीवांची हिंसा होऊ नये याची काळजी घेतली जाते.
तसंच जैन धर्मात अहिंसा, त्याग आणि अपरिग्रह (कुठल्याही वस्तूचा संग्रह न करणे) यांना अत्यंत महत्त्व आहे.
त्यामुळे ते कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुखसोयींपासून दूर राहण्याचा प्रयत्न साधू करतात.
बूट-चप्पल वापरणे ही एक प्रकारची मालमत्ता किंवा सुविधा मानली जाते, त्यामुळे त्याचा त्याग करतात.
जैन परंपरांमध्ये पायी प्रवास करणे नियमबद्ध मानले जात असल्याने जैन मुनी अनवाणी पायाने प्रवास करतात.