Rajanand More
केरळमधील तिरुवअनंतपुरम लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार शशी थरूर. सध्या काँग्रेसच्या भूमिकेविरोधात मतं मांडत असल्याने राजकीय वर्तूळात त्यांची खूप चर्चा होत आहे. ते भाजपमध्ये जाऊ शकतात, असेही तर्क लावले जात आहेत.
थरूर हे केरळमध्ये लोकप्रिय असल्याचे एका सर्व्हेतून समोर आले आहे. विशेष म्हणजे या सर्व्हेमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये सर्वाधिक मते थरूर यांना मिळाली आहेत.
आगामी विधानसभा निवढणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफचा वरचष्मा राहणार असल्याचेही सर्व्हेमधून समोर आले आहे. ‘केरळ व्होट वाईब सर्व्हे 2026’ काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
डाव्या पक्षांच्या सरकारविरोधात जनतेमध्ये असंतोष असून जवळापस 62 टक्के मतदारांना विद्यमान आमदार नको आहे. त्यातून सरकारविरोधातील संताप दिसून आल्याचे सर्व्हेमध्ये म्हटले आहे.
यूडीएफच्या मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये थरूर यांनी आघाडी घेतली आहे. त्यांच्या बाजूने 28.3 टक्के लोकांनी मते नोंदवली आहे. त्यामध्ये पुरूषांचा आकडा 30 टक्के तर महिलांचा 27 टक्के एवढा आहे.
सर्व्हेमध्ये थरूर हे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून आघाडीवर असले तरी काँग्रेसमध्ये त्यांच्याविरोधात नाराजीचा सूर आहे. त्यामुळे थरूर यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करण्यात काँग्रेस नेते उत्सुक नाहीत, हे स्पष्टच आहे.
थरूर हे मागील काही महिन्यांपासून मोदी सरकारचे सातत्याने कौतुक करत आहेत. तर काँग्रेसच्या धोरणांना छेद देणारी विधाने करत नाराजी ओढवून घेत आहेत.
ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्र सरकारने विदेशात पाठवलेल्या एका शिष्टमंडळाचे थरूर नेतृत्व करत होते. यादरम्यानही पक्षविरोधी भूमिका मांडली होती. तर नुकतेच त्यांनी एका लेखातून आणीबाणीला काळा अध्याय म्हटले. त्यामुळे ते काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नसतील, हे स्पष्ट आहे.