Rajanand More
तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी पद स्वीकारल्यापासून प्रशासनात शिस्त आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांनी अनेक अनुभवी आयएएस अधिकाऱ्यांना दिमतीला घेतले आहे.
तामिळनाडूचे मुख्य सचिव एम. साई कुमार हे ३१ ऑगस्ट रोजी सेवेतून निवृत्ती होणार होते. पण त्यांना मुदतवाढ मिळावी, अशी मागणी विजय यांच्या सरकारने केंद्र सरकारकडे केली होती.
अखेर केंद्र सरकारने राज्य सरकारची विनंती मान्य केली आहे. साई कुमार यांना १ सप्टेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीसाठी म्हणजेच सहा महिन्यांची सेवावाढ देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकांच्या काळात केंद्रीय निवडणूक आयोगाने एन. मुरुगानंदम यांच्या जागी एम. साई कुमार यांची तामिळनाडूचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली होती.
टीव्हीके (TVK) सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यंमत्री विजय यांनी अनेक वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मात्र साई कुमार यांच्यावर सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी म्हणून विश्वास कायम ठेवला.
एम. साई कुमार यांनी यापूर्वी विविध विभागांचे प्रमुख म्हणून महत्त्वाची पदे सांभाळली आहेत. राज्यातील सर्वात अनुभवी अधिकारी म्हणून पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या विजय यांनी त्यांना आणखी महिन्यांसाठी सोबत ठेवण्याचा निर्णय घेतला.
साई कुमार हे २०१८ ते २०२२ या कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री एडप्पडी के. पलानीस्वामी यांचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते.
१९८७ मध्ये राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त केलेले साई कुमार हे १९९० च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. प्रशासनात त्यांची तब्बल ३६ वर्षांची सेवा आहे.