Ganesh Sonawane
कृषी विभागातील क्षेत्रीय कर्मचारी गेल्या दहा वर्षांपासून कामकाजासाठी लॅपटॉप देण्याची मागणी करत होते. अखेर त्यांच्या या दीर्घकालीन मागणीला शासनाने मंजुरी दिली आहे.
कृषी आयुक्तालयाने अधिकृतपणे लॅपटॉप वितरण प्रक्रिया सुरू केली आहे. विभागीय आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना याबाबत आदेशही जारी करण्यात आले आहेत.
आयुक्तालयाने वितरणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील काही दिवसांत सर्व पात्र कर्मचाऱ्यांच्या हाती लॅपटॉप पोहोचणार आहेत.
राज्यातील 10,620 सहाय्यक कृषी अधिकारी, 1,770 उपकृषी अधिकारी आणि 885 मंडल कृषी अधिकाऱ्यांसह एकूण 13,275 कर्मचाऱ्यांना लॅपटॉप मिळणार आहेत.
कृषी विभागाच्या योजना, अनुदान प्रक्रिया, अहवाल सादरीकरण आणि विविध सेवा पूर्णपणे ऑनलाइन झाल्यानंतर क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना लॅपटॉपची गरज तीव्रतेने जाणवत होती.
गतवर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉपच्या मागणीसाठी तब्बल 13 दिवसांचा संप पुकारला होता. या आंदोलनानंतर सरकारवर दबाव वाढला होता.
तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मागणी मान्य करून प्रक्रिया सुरू केली. नंतर लॅपटॉप की टॅब यावर चर्चा झाली, मात्र कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लॅपटॉपच देण्याचे निर्देश दिले.
नोव्हेंबर 2025 मध्ये शासन निर्णय जारी झाला होता. मात्र वितरणाला विलंब झाला. अखेर 10 जून रोजी आयुक्तालयाने आदेश काढत वितरण प्रक्रिया सुरू केली आणि कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला.