Rajanand More
राज्य निवडणूक आयोगाकडून आज राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याबरोबरच आचारसंहिताही लागू झाली आहे. पण ही आचारसंहिता संपूर्ण राज्यासाठी लागू असेल की ठराविक भागापुरतीच, याबाबत आयोगाकडून माहिती देण्यात आली आहे.
निवडणुकीतील भ्रष्ट आचरण आणि निवडणूक विषयक गुन्हे प्रतिबंधित करणे, शासकीय यंत्रणा आणि पदाचा दुरूपयोग यावर प्रतिबंध, मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणाऱ्या योजना किंवा कृत्यांवर अंकुश ठेवणे आदी.
अंमलबजावणीची जबाबदारी नगरपरिषद, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींसाठी संबंधित जिल्हाधिकारी व महापालिकांसाठी संबंधित आयुक्त यांची राहील.
सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संपूर्ण क्षेत्रासाठी लागू राहील.
संबंधित नगरपंचायत किंवा नगरपरिषदेच्या क्षेत्रासाठी आचारसंहिता लागू झाली असली तरी त्याबाहेरील आजूबाजूच्या क्षेत्रात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमुळे मतदारांवर प्रभाव पडून निवडणुकीवर परिणाम होऊ शकेल, असे कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत.
आयोगाने निवडणुका घोषित केल्याची वेळ व दिनांकापासून ते मतमोजणीच्या निकालापर्यंत लागू राहील.
पहिला टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या आदल्या दिवसापर्यंत आयोगाच्या पूर्वपरवानगीने धोरणात्मक निर्णय घेता येतील. दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाल्यानंतर असे निर्णय घेता येणार नाहीत.