Rashmi Mane
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अखेर मोठा यश मिळालं आहे.
सरकारने त्यांच्या बहुतेक मागण्या मान्य केल्या असून त्याबाबतचे पत्र उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी जरांगे यांना सुपूर्द केले.
पाच प्रमुख मागण्यांपैकी गॅझेटियरसंबंधीच्या तीन मागण्या तातडीने लागू करण्याचा निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे हैदराबाद आणि सातारा गॅझेटियरची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
तसेच आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जातील. आंदोलनात प्राणाची आहुती दिलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना एक आठवड्यात मदत दिली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
या निर्णयानंतर जरांगे यांनी सरकारचे आभार मानले. मात्र त्यांनी अभ्यासकांना इशारा देत सांगितले की, यावेळी चूक झाल्यास जबाबदार धरले जाईल.
बैठकीदरम्यान शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा गॅझेटियर लागू करण्याची जबाबदारी स्वतः घेतली.
चर्चेनंतर जरांगे यांनी सरकारने घेतलेले निर्णय योग्य आहेत का याची पडताळणी करण्यासाठी अभ्यासकांकडे पाठवले जाणार असल्याचे सांगितले.
योग्य ठरल्यास त्वरित शासन निर्णय काढला जाईल. या घडामोडींमुळे मराठा आरक्षण आंदोलनाला दिलासा मिळाला असून, जरांगे पाटलांच्या उपोषणाचा यशस्वी शेवट झाला आहे.