Rajanand More
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशभरात मतदारयाद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे SIR मोहीम हाती घेण्यात आली आहे. काही राज्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
आतापर्यंत या प्रक्रियेचे दोन टप्पे पूर्ण झाले असून तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्राचा समावेश आहे. राज्यात ही प्रक्रिया ३० जूनपासून सुरू झाली आहे. या प्रक्रियेतील महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा. अन्यथा मतदानापासून वंचित राहावे लागेल.
निवडणूक आयोगाकडून ता. ३० जून ते २९ जुलै या कालावधीत घरोघरी गणना पत्रांचे वितरण केले जाणार आहे. त्याआधीत मतदारांची आवश्यक माहिती संकलित केली जाईल.
मतदारांची माहिती संकलित केल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादीचे आयोगाकडून प्रकाशन केले जाईल. ही यादी अंतिम नसेल.
प्रारुप मतदार यादीबाबत काही दावे किंवा हरकती असल्यास नागरिकांना ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत नोंदविता येतील. हा कालावधी महत्वाचा असेल.
नोटीस टप्पा किंवा दावे व हरकती निकाला काढण्यासाठी ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. नागरिकांनी केलेल्या हरकतींवर आयोगाकडून अंतिम निर्णय घेतला जाईल.
हरकती निकाली काढल्यानंतर आयोगाकडून ७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादीचे प्रकाशन केले जाईल. ही मतदार यादीच पुढील निवडणुकांसाठी वापरली जाईल.
SIR ही महत्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे मतदारांना अत्यंत सावधगिरी बाळगत आपले आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचे नाव मतदारयादीत आहे किंवा नाही, याची खातरजमा करावी लागेल. त्यासाठी आयोगाकडून वेगवेगळ्या टप्प्यावर संधी देण्यात येणार आहे.