Roshan More
महसूल विभागातील अर्धन्यायिक प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित राहत असल्याने पक्षकारांना न्यायासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते.
हीच प्रतीक्षा संपवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त राज्यात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ राबविण्यात येणार आहे.
१ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत हे अभियान राबविले जाणार आहे.
मंडल अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी प्रांत तसेच अपर जिल्हाधिकाऱ्यांकडील अर्धन्यायिक महसुली दावे दोन्ही पक्षकारांच्या परस्पर संमतीने तडजोडीच्या माध्यमातून निकाली काढण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार आहे.
दोन्ही पक्षकारांना तडजोडीची संधी उपलब्ध करून देत परस्पर सहमतीने वाद संपविण्याचा प्रयत्न या लोकअदालतीच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना महसूल न्यायालयांच्या फेऱ्यांपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
प्रलंबित दाव्यातील दोन्ही पक्षकार किंवा त्यांचे वकील संयुक्तपणे विहित ‘प्रपत्र-अ’ मध्ये तडजोडीसाठी अर्ज करू शकतील. प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर दोन्ही पक्षांच्या इच्छेनुसार आणि कायदेशीर तरतुदींनुसार तडजोडनामा तयार केला जाणार आहे.
वर्षानुवर्षे सुरू असलेल्या वादांना सामंजस्याच्या माध्यमातून कायमचा पूर्णविराम देण्याची संधी पक्षकारांना मिळणार आहे.