Rashmi Mane
महाराष्ट्रातील शेतीत आता तंत्रज्ञानाची नवी क्रांती घडणार आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक ‘महाविस्तार एआय अॅप’ लॉन्च केले असून हे अॅप शेतकऱ्यांचा खरा अर्थाने ‘डिजिटल मित्र’ ठरणार आहे.
अत्याधुनिक मोबाईल अॅप्लिकेशन शेतकऱ्यांच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना अचूक आणि शास्त्रीय माहिती पुरवून त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करेल.
या अॅपद्वारे हवामानाचा अंदाज, बाजारभाव, पिकांवरील रोग, कीड नियंत्रण, तसेच शासनाच्या कृषी योजनांची माहिती शेतकऱ्यांना एका क्लिकवर मिळू शकणार आहे.
या अॅपचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे 'एआय चॅटबॉट' आणि 'एआय पीक निदान'. 'एआय चॅटबॉट'च्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतीविषयक कोणत्याही प्रश्नांची उत्तरे थेट संवाद साधून मिळवू शकतील.
तर 'एआय पीक निदान' या सुविधेद्वारे, शेतकरी आपल्या पिकाचा फोटो काढून अॅपवर अपलोड केल्यास, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने (Artificial Intelligence) पिकावरील रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव तात्काळ ओळखला जाईल आणि त्यावर तज्ञांचे उपाय सुचवले जातील.
या डिजिटल क्रांतीमुळे शेतकऱ्यांना आता चुकीच्या खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर टाळता येणार आहे, ज्यामुळे उत्पादन खर्चात घट होईल. तसेच, बाजारभावांची अचूक माहिती मिळाल्याने आपल्या शेतमालाला योग्य किंमत मिळवणेही सोपे होणार आहे.
शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती, अनुदान आणि विमा योजनांचे तपशीलही या एकाच अॅपवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
राज्य सरकारच्या या डिजिटल उपक्रमामुळे शेती व्यवस्थापन अधिक स्मार्ट आणि परिणामकारक होणार आहे. ‘महाविस्तार एआय अॅप’ हे केवळ एक मोबाईल अॅप नाही, तर शेतकऱ्यांच्या प्रगतीचा नवा मार्ग, आणि महाराष्ट्रातील शेतीच्या डिजिटल भविष्यासाठीचे भक्कम पाऊल ठरणार आहे.