Rashmi Mane
देशभरात कोट्यवधी लोक यूपीआय (Unified Payments Interface) चा वापर करत आहेत. भाजी खरेदी करण्यापासून ते मित्रांना पैसे पाठवण्यापर्यंत छोटे मोठे व्यवहार यूपीआयने सोपे केले आहेत.
1 ऑगस्ट 2025 पासून यूपीआयच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने हे नियम अधिक सुरक्षित आणि तंत्रज्ञानस्नेही करण्यासाठी लागू केले आहेत.
या बदलांचा थेट परिणाम फोनपे, गुगल पे, पेटीएमसह सर्व यूपीआय अॅपवर होणार आहे.
आता यूझर्स दिवसाला केवळ 50 वेळा बॅलेंस चेक करू शकतील. याआधी मर्यादा नव्हती, त्यामुळे सर्व्हरवर ताण येत होता आणि व्यवहार प्रक्रियेत उशीर होत होता.
अनेकांचे एका मोबाईल नंबरवर एकापेक्षा जास्त बँक खाते लिंक असतात. आता एका नंबरशी लिंक असलेल्या खात्यांचा बॅलेंस दिवसातून फक्त 25 वेळाच पाहता येईल.
व्यवहार केल्यानंतर पेमेंट स्टेटस दिवसातून फक्त तीनवेळाच पाहता येईल. तसेच प्रत्येक तपासणीत किमान 90 सेकंदांचे अंतर असणे बंधनकारक आहे.
ऑटोपे सिस्टीमसाठी NPCI ने वेळ निश्चित केली आहे. सकाळी 10 वाजण्यापूर्वी, दुपारी 1 ते 5 या दरम्यान आणि रात्री 9: 30 नंतरच ऑटोपे करता येईल.
पेमेंट रिव्हर्सल किंवा चार्जबॅकसाठी देखील नवे नियम आले आहेत. आता एका महिन्यात फक्त 10 वेळा चार्जबॅक करता येईल आणि एका व्यक्तीकडून जास्तीत जास्त 5 वेळाच परतावा मागता येईल.
NPCI चा उद्देश म्हणजे यूपीआय व्यवहार अधिक सुरक्षित करणे, सर्व्हरवरील ताण कमी करणे आणि वापरकर्त्यांना अधिक सुलभ सेवा देणे. त्यामुळे येत्या काळात यूपीआय वापरताना हे नवे नियम पाळणे बंधनकारक असेल.