Rajanand More
काँग्रेस नेत्या मिनाक्षी नटराजन यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विश्वासू नेत्यांच्या गटातील मानल्या जातात.
नटराजन यांच्या उमेदवारीमुळे मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना उमेदवारी दिली जावी, अशी मागणी होत होती.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांची मुदत संपल्याने ही जागा रिक्त होत आहे. त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते.
दिग्विजय सिंह यांनीच नटराजन यांच्याविषयी सौ टका टंच माल असे विधान केले होते. शंभर टक्के शुध्द, असे सांगत खुलासाही केला होता. त्यावर आपले कौतुक केल्याचे नटराजन म्हणाल्या होत्या.
नटराजन या गांधीवादी विचारांच्या नेत्या असून अत्यंत साधे राहणीमान ही त्यांची ओळख आहे. सिंह यांनीही त्यांना शुभेच्छा देताना त्याचा उल्लेख केला.
मध्य प्रदेशातील मंदसौर लोकसभा मतदारसंघाच्या त्या २००९ ते २०१४ या कालावधीत खासदार होत्या. त्यानंतर पुढच्या दोन निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला.
विद्यार्थी दशेपासून काँग्रेसमध्ये असलेल्या नटराजन या NSUI च्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या. तसेच युवक काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.
राहुल गांधी यांच्या विश्वासू नेत्या म्हणून नटराजन यांची ओळख असून सध्या त्या तेलंगणाच्या प्रभारी आहेत. संघटन पातळीवरही त्या महत्वाची भूमिका पार पाडत आहेत.