Rajanand More
नेपाळ सरकारने काही दिवसांपूर्वी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअपसह इतर 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. त्यावर सरकारचे काहीच नियंत्रण नसल्याचे कारण दिले आहे. त्याविरोधात युवक रस्त्यावर उतरले आहेत.
बंदीच्या निर्णयाविरोधात युवक-युवती आक्रमक झाले आहेत. सोशल मीडियातूनच आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर युवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप होत आहे.
काठमांडूमध्ये सोमवारी (ता. 8) हजारो युवकांनी संसदेवर अचानक हल्लाबोल केला. त्यामध्ये शाळा-महाविद्यालयांतील युवकांचा मोठा सहभाग होता. सुरूवातीला पोलिसांनी त्याविरोधात पावले उचलली नाहीत.
युवकांनी संसदेच्या सीमाभिंतवर चढून आत जाण्याचा प्रयत्न केला. एक रुग्णवाहिकाही जाळली. त्यानंतर सुरक्षारक्षकांनीही त्यांना हटविण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, रबराच्या गोळ्या चालविल्या. त्यानंतर आंदोलन अधिकच भडकले.
सुरक्षारक्षकांच्या प्रत्युत्तरामध्ये काही युवकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो जण जखमी झाले आहेत. त्यामुळे आता हे आंदोलन चांगलेच चिघळण्याची शक्यता आहे.
काठमांडूतील लोण इतर भागांतही पोहचले. काही शहरांमध्ये आज छोट्या प्रमाणात आंदोलने होत होती. युवकांच्या मृत्यूच्या बातम्या समोर आल्यानंतर तिथेही तीव्रता वाढली.
आंदोलनाचा भडका उडाल्यानंतर जेन जी नावाच्या एका प्रोफाईलवरून युवकांना घरी जाण्याचे आवाहन करण्यात आले. काही जणांकडून जाणीवपूर्वक हे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा.
सरकारच्या निर्णयाविरोधात युवक आक्रमक झाल्याने सरकारला बंदीचा पुनर्विचार करावा लागणार आहे. इकडं आड तिकडं विहीर अशी सरकारची स्थिती झाली आहे.