Rajanand More
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांनी मंगळवारी (ता. २०) पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी देशभरातील भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. नबीन यांनी पहिल्याच भाषणात कोणता संदेश दिला, विरोधकांना कोणता टोला लगावला, हे पाहूयात.
भारतीय जनता पक्षामध्ये संघटन ही केवळ एक व्यवस्था नाही, तर ती एक संस्कार आहे. आज राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीची निवड ही एका साध्या कार्यकर्त्याच्या असामान्य प्रवासाला मिळालेली पावती आहे.
भाजपा ही देशातील एकमेव अशी पार्टी आहे जिथे मोठ्या पदांसाठी आणि मोठ्या जबाबदाऱ्यांसाठी कोणत्याही खास कुटुंबात जन्माला आलेले असणे आवश्यक नाही. येथे साधा कार्यकर्ता असणे हीच सर्वात मोठी पात्रता.
संघटनेतून एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती देशाचा पंतप्रधान होऊ शकतो आणि एक साधा कार्यकर्ता राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकतो.
पक्षातील ज्येष्ठ नेते आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या अढळ विश्वासामुळे व अपार सहकार्यामुळेच हे शक्य झाले आहे. हीच भारतीय जनता पक्षाची आत्मा आहे, आणि तीच त्याला इतर राजकीय पक्षांपेक्षा मूलतः वेगळे बनवते.
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानापासून ते पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानववादापर्यंत, अटल बिहारी वाजपेयी यांच्या आदर्शांपासून ते मोदींच्या निर्णायक आणि दूरदर्शी नेतृत्वापर्यंत, भाजपाचा प्रत्येक टप्पा एका संकल्पानेच चालवला गेला आहे: राष्ट्र प्रथम.
भाजपाने नेहमीच युवा शक्तीवर विश्वास ठेवला आहे, आणि हा विश्वास केवळ घोषणांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो संघटनेच्या रचनेत, निर्णयप्रक्रियेत आणि नेतृत्वनिर्मितीत सातत्याने दिसून येतो.
राजकारण ही १०० मीटरची शर्यत नसून ती मॅरेथॉन आहे. १०० मीटरच्या शर्यतीत वेगाची परीक्षा होते, तर मॅरेथॉनमध्ये सहनशक्तीची परीक्षा होते. त्यामुळे युवकांनी संयमाने राजकारणाच्या मैदानात टिकून राहणे आवश्यक आहे.
सेवा, विस्तार आणि कार्यकर्ता सशक्तीकरणाची ही संघटनात्मक यात्रा देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि देशभरातील समर्पित कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमातून पुढे चालत आली आहे, आणि पुढेही याच सामूहिक शक्तीने पुढे जाईल.
तुम्ही केवळ कार्यकर्ते नाही, तर राष्ट्रनिर्माणाचे सैनिक आहात. तुमचा संघर्ष, तुमची निष्ठा आणि तुमचे परिश्रम हे भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठीची सर्वात भक्कम पायाभरणी आहेत.
आपले ध्येय अगदी स्पष्ट आहे, २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवणे आणि पंतप्रधानजींच्या संकल्पाला साकार करणे. असा भारत घडवणे जिथे विकास आणि वारसा एकत्र पुढे जातील.