Jagdish Patil
माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या वक्तव्यामुळे इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सुवर्ण मंदिरात झालेलं ऑपरेशन ब्लू स्टार पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
ऑपरेशन ब्लू स्टारची पद्धत चुकीची होती, ज्याची किंमत इंदिरा गांधींना त्यांचा जीव गमावून चुकवावी लागली, असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे.
मात्र, हे ऑपरेशन करण्याचा निर्णय पोलीस, गुप्तचर विभागाने मिळून घेतला होता. त्यामुळे यासाठी फक्त इंदिरा गांधींना दोष देता येणार नाही, असंही चिदंबरम म्हणाले.
दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुवर्ण मंदिरात बुटांसह सैन्य शिरल्यामुळे तिथे रक्ताचे सडे पडले. ज्यामुळे शिख धर्मियांच्या भावना दुखावल्या असंही ते म्हणाले.
तर पी. चिदंबरम यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आणि इंदिरा गांधींच्या हत्येला कारणीभूत ठरलेलं ऑपरेशन ब्लू स्टार काय होतं? ते जाणून घेऊया.
ऑपरेशन ब्लू स्टारला 40 वर्षे झाली. पंजाबला वेगळा देश म्हणजेच खालिस्तान म्हणून मान्यता देण्याची मागणी करणारे अतिरेकी सुवर्ण मंदिरात तळ ठोकून बसले होते.
या अतिरेक्यांविरोधातील ऑपरेशन ब्लू स्टारची कारवाई जून 1984 मध्ये सुरू करण्यात आली. ज्यामध्ये भारतीय लष्कराच्या 83 सैनिकांचा मृत्यू आणि 248 सैनिक जखमी झाले.
तसंच 492 सामान्य लोकांचा मृत्यू झाला आणि 1,592 लोकांना अटक करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण जगातील शीख धर्मियांच्या भावना दुखावल्या.
हे ऑपरेशन भारतीय सैन्याचा विजय, मात्र राजकीयदृष्ट्या पराभव होता. कारण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या त्यांच्या शीख अंगरक्षकांनी या ऑपरेशनच्या बदल्यात केली होती.