Rashmi Mane
दिवस होता 13 डिसेंबर, संसदेत हिवाळी अधिवेशन सुरु होते. संसदेत विरोधकांच्या गदारोळात अधिवेशन गाजत होते.
संसद भवनात 100 हून अधिक व्हीआयपी उपस्थित होते. सभागृहाच्या बाहेर नेते, पत्रकार होते, सगळं रोजच्यासारखं सुरू होतं.
सकाळी 11 वाजून 28 मिनिटांनी एक पांढरी अॅम्बेसडर गाडी संसद भवन परिसरात गेट क्रमांक 12 मध्ये आली. गृह मंत्रालयाचे बनावट स्टिकर असलेली गाडी संसद भवनात घुसली.
कारच्या वरती लाल दिवा लावण्यात आला होता. संसद भवनात आल्यानंतर गाड्यांची स्पीड कमी असते. पण या गाडीची स्पीड जास्त होता. त्यामुळे संसद भवनात सुरक्षेसाठी तैनात सुरक्षारक्षक जगदीश यादव यांना शंका आली.
जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाचे पाच दहशतवादी आत बसले होते. मुख्य इमारतीकडे जात असताना दहशतवाद्यांचे वाहन चुकून उपराष्ट्रपतींच्या ताफ्यासमोर आले.
घाबरलेल्या स्थितीत त्यांची कार ताफ्यातून प्रवास करणाऱ्या सुरक्षा वाहनाला धडकली. दहशतवादी बाहेर आले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला.
त्या पांढऱ्या ॲम्बेसेडर कारमध्ये एके-४७ रायफल, ग्रेनेड लाँचर, पिस्तूल आणि हँडगनचा साठा होता. पाच जण बाहेर येताच त्यांनी गोळ्या झाडायला सुरुवात केली.
या हल्ल्यात सुरक्षा कर्मचाऱ्यांसह नऊ जण ठार झाले होते, तर 18 जण जखमी झाले होते. सुदैवाने एकही खासदार या दहशतवाद्यांचे लक्ष्य झाला नाही.
जवळजवळ 45 मिनिटे दहशतवादी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये हा गोळीबार सुरु होता. या हल्ल्यात दिल्ली पोलिसांचे पाच जवान, केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाची एक महिला सुरक्षारक्षक, राज्यसभा सचिवालयाचे दोन कर्मचारी आणि एका माळी यांचा मृत्यू झाला होता.