Rashmi Mane
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनावेळी ‘उडान योजना’चा विशेष उल्लेख केला. या योजनेने भारताच्या नागरी विमानवाहतूक क्षेत्रात एक क्रांती घडवून आणली आहे.
'उडान – उडे देश का आम नागरिक’ या योजनेचे उद्दिष्ट साधे पण दूरदर्शी आहे. प्रत्येक भारतीयाला स्वस्त, सुलभ आणि सुरक्षित हवाई प्रवास उपलब्ध करून देणे.
पूर्वी हवाई प्रवास हा केवळ श्रीमंतच करू शकतात असं मानला जात होता. मात्र, 2016 मध्ये केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘उडान’ योजनेने हा समज पूर्णपणे बदलला आहे.
या योजनेअंतर्गत सरकारने देशभरातील बंद किंवा वापरात नसलेल्या विमानतळांना पुन्हा सुरु केले आणि लहान शहरांमध्ये विमानतळ बांधण्यात आले.
सरकार आणि एअरलाइन कंपन्यांमधील Viability Gap Funding (VGF) प्रणालीमुळे तिकीटांचे दर सामान्य नागरिकांच्या आवाक्यात ठेवले गेले त्यामुळे प्रति तास प्रवासासाठी केवळ 2,500 रुपये आकारले जाऊ लागले.
2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, या योजनेअंतर्गत 500 हून अधिक हवाई मार्गांना मान्यता मिळाली असून 75 पेक्षा अधिक नवीन विमानतळ, हेलिपोर्ट आणि वॉटर एअरोड्रोम सुरू झाले आहेत.
'उडान योजना’मुळे लहान शहरांमध्ये पर्यटन, व्यापार आणि उद्योगाच्या नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असून वैद्यकीय सेवा, शिक्षण आणि आपत्कालीन वाहतुकीसाठी हवाई संपर्क सुलभ झाला आहे.
रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण झाल्या आहेत. पायलट प्रशिक्षण, ग्राउंड स्टाफ, एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि विमानतळ व्यवस्थापन या क्षेत्रांत महिलांचा सहभाग वाढला आहे.