Deepak Kulkarni
पुण्यातील तळेगाव दाभाडे परिसरातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत चार जणांना जीव गमवावा लागला होता.
वेळेआधीच पावसाळा सुरू झाल्यानंतर पर्यटनासाठी मोठ्या संख्येनं सुट्ट्यांच्या दिवशी लोक घराबाहेर पडू लागले आहेत.
त्यामुळे पावसाळ्यात पुण्याजवळील अनेक पर्यटनस्थळं त्यात धबधबे, घाट, किल्ले आणि धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होताना दिसून येते.
यावेळी स्थानिक प्रशासनानं केलेल्या सूचनांचं पालन न करता अनेकजण हुल्लडबाजी करतात त्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत.
या अपघातात पर्यटनस्थळांवर स्वत:सह इतरांच्या जीवालाही धोका उद्भवण्याची शक्यता असते.
अशा दुर्घटना रोखण्यासाठी किंवा हुल्लडबाजी नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पुणे जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर आता शुल्क आकारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याविषयीची माहिती दिली आहे.यावेळी त्यांनी या शुल्क आकारण्यापाठीमागचा हेतूही सांगितला.
या मागचा प्रशासनाची भूमिका ही आर्थिक लाभ प्राप्त नसून गर्दीवरील प्रतिबंध, सुरक्षेची काळजी आणि पर्यटनस्थळांचं संवर्धनाची आहे. धोकादायक स्थळांवर पर्यटकांच्या प्रवेशावर मर्यादा घालण्यात येणार असल्याचंही जिल्हाधाकिारी डुडी यांनी सांगितलंं.