Rashmi Mane
महाराष्ट्रातील पर्यटन वाढवण्यासाठी आणि पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे.
या योजनेअंतर्गत, राज्यातील निवडक किल्ल्यांवर 'नमो पर्यटन माहिती सुविधा केंद्र' (Namo Tourism Information Facilitation Centres) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याच्या पर्यटन विभागाने राज्यातील पर्यटन वाढावे, पर्यटकांना महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास समजावा आणि चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी ही केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रांना दिलेले 'नमो' हे नाव वादाचे मुख्य कारण ठरले आहे. 'नमो' हे नाव थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडले जात असल्याने, हे नामकरण अयोग्य असल्याचे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
याचा उद्देश: पर्यटकांना एकाच ठिकाणी पर्यटनस्थळाची माहिती, इतिहास, मार्गदर्शन, आणि विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करणे. यातून स्थानिक युवकांना पर्यटन क्षेत्रात रोजगार व कौशल्य विकासाच्या संधीही मिळणार आहेत, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील चार महत्त्वाच्या किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे.
रायगड
प्रतापगड
शिवनेरी
साल्हेर
या केंद्रांची उभारणी लवकरच सुरू करण्यासाठी राज्य शासनाने पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
या चार किल्ल्यांवरील केंद्रांना मिळणाऱ्या प्रतिसादानंतर पुढील टप्प्यात राज्यातील सुमारे 75 पर्यटनस्थळांपर्यंत या केंद्रांचा विस्तार करण्याची सरकारची योजना आहे. ही केंद्रे 'प्रादेशिक पर्यटन विकास योजने' अंतर्गत सुरू करण्यात येणार आहेत.