Rashmi Mane
रिक्षाचालकाच्या मुलाला एका अपमानाने इतकी प्रेरणा दिली की त्याने थेट UPSC परीक्षा उत्तीर्ण करून IAS अधिकारी बनण्याचा मान मिळवला. ही आहे गोविंद जयस्वाल यांची प्रेरणादायी कहाणी.
वाराणसीतील एका सामान्य कुटुंबात गोविंद यांचा जन्म झाला. वडील रिक्षा चालवून घर चालवत होते. आई-वडील आणि तीन बहिणींसह अत्यंत साध्या परिस्थितीत त्यांचे बालपण गेले.
गोविंद सातवीत असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. आर्थिक अडचणी वाढल्या, पण त्यांनी शिक्षण सोडण्याचा विचार कधीच केला नाही.
११ व्या वर्षी मित्राच्या घरी गेलेल्या गोविंद यांना काही लोकांनी "रिक्षाचालकाचा मुलगा" म्हणून हिणवले. भविष्यात तुलाही रिक्षाच चालवावी लागेल, असे टोमणे मारले गेले.
त्या शब्दांनी गोविंद यांच्या मनात जिद्द निर्माण केली. परिस्थितीपुढे हार मानायची नाही आणि काहीतरी मोठं करून दाखवायचं, असा निर्धार त्यांनी केला.
एका ज्येष्ठ व्यक्तीकडून UPSC परीक्षेबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी IAS अधिकारी बनण्याचं लक्ष्य ठरवलं. वडिलांनी जमीन विकून मुलाच्या शिक्षणासाठी मदत केली.
दिल्लीत राहून गोविंद विद्यार्थ्यांना गणित शिकवत होते. एक वेळच जेवण करून खर्च वाचवत अभ्यास केला. त्याच जिद्दीच्या जोरावर त्यांनी UPSCची तयारी पूर्ण केली.
2006 मध्ये गोविंद जयस्वाल यांनी UPSC परीक्षेत 48 वी रँक मिळवत IAS अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. आज त्यांची सक्सेस स्टोरी लाखो तरुणांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरली आहे.