Deepak Kulkarni
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नऊपैकी सहा खासदार फुटले आहेत. या बंडामुळे चार वर्षांनंतर दुसऱ्यांदा ठाकरेंचा पक्ष फुटला आहे.
एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये 40 आमदारांसह उद्धव ठाकरेंची जय महाराष्ट्र केल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली होती.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू नेते असलेल्या छगन भुजबळांनी शिवसेनेतलं सर्वात पहिलं बंड केलं होतं. 1991मध्ये भुजबळांनी शिवसेना सोडली. भुजबळांसोबत 18 आमदार बाहेर पडणार होते. पण ऐनवेळी 12 आमदारांनी कच खाल्ल्यानंतर सहा आमदारच त्यांच्यासोबत बाहेर पडले.
छगन भुजबळांनंतर 1999 मध्ये शिवसेनेतलं मोठं नाव आणि लढवय्या नेता ओळख असलेल्या गणेश नाईक यांनी शिवसेनेची साथ सोडली. ते बाहेर पडल्यानंतर शिवसेनेला नवी मुंबई महापालिका जिंकता आली नाही. नाईक यांनी यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. नाईक यांनी भाजप गाठली. ते सध्या मंत्री आहेत.
शिवसेनेचे दुसरे मुख्यमंत्री राहिलेल्या नारायण राणे यांनी शिवसेना सोडणं हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला गेला होता. 2005 मध्ये राणेंनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत 10 आमदारांनी शिवसेना सोडली होती.
राज ठाकरे यांनी पक्ष सोडणं हा शिवसेनेसोबतच ठाकरे कुटुंबासाठी मोठा धक्का होता. 2006 मध्ये त्यांनी शिवसेना सोडल्यावर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नव्हता. त्यांनी मनसेची स्थापना करून आपल्या करिष्म्यावर आमदार व नगरसेवक निवडून आणले होते.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांसह जून 2022 मध्ये पुकारलेले बंड हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठं सत्तांतर ठरलं. त्यांनी भाजपच्या साथीनं सत्ता स्थापन केली आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. ते सध्या उपमुख्यमंत्री आहेत.
फुटलेल्या पाच खासदारांपैकी सर्वाधिक चर्चा धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांची होत आहे. ठाकरेंचा निष्ठावंत खासदार ओळख असलेल्या ओमराजेंनी शिवसेना सोडल्यावर शिवसैनिकांना मोठा धक्का बसला.