Deepak Kulkarni
साखरेच्या दरात दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. सध्या दर 80 रुपये किलोपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे.
तसेच येत्या सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे साखरेचे दर 100 रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यापारी वर्गाकडून व्यक्त केला जात आहे.
सरासरी महिन्याला 3 लाख टन साखरेचा वापर राज्यात होत असतो. आता महाराष्ट्राकडे सुमारे 17 ते 18 लाख टन साखर शिल्लक असल्याची माहिती साखर विभागाने दिली आहे.
साखरेचे वाढते दर लक्षात घेता केंद्र सरकारने 1 ऑगस्टपासून 30 नोव्हेंबरपर्यंत साठा मर्यादेचे निर्बंध लागू केले आहेत.
अन्न व पुरवठा विभागाकडून साखर साठ्याबाबत आदेश जारी, 4000 क्विंटलपेक्षा अधिकच्या साखरेचा साठा न करण्याचे निर्देश दिले असून अन्यथा कारवाई केली जाणार आहे.
सरकारकडून 31 ऑक्टोबरपर्यंत 10 लाख टन साखर आयात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याचदरम्यान, व्यापारी, ग्राहक यांसह विविध उत्पादकांनाही साठा मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी केंद्र सरकारकडे साखरेची साठेबाजी आणि काळाबाजार याविरोधात कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या https://foodstock.dfpd.gov.in/ या पोर्टलवर सर्व विक्रेत्यांना साखरेच्या साठ्याची माहिती घोषित करून ती नियमितपणे अद्ययावत ठेवणे बंधनकारक असणार आहे.