Deepak Kulkarni
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध पुन्हा एकदा ताणले गेले आहेत.
भारतासह पाकिस्तानकडूनही युध्दाची तयारी सुरू करण्यात आली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात अतिशय आक्रमक भूमिका घेत अनेक कठोर निर्णय घेतले आहेत.
भारत आणि पाकिस्ताननं एकमेकांसोबतचे सगळे संबंध तोडले असताना दोन्ही देशांनी आपापले सैन्य सज्ज ठेवले आहे.
पहलगामनंतर पाकिस्ताननं भारताला अनेकदा धमकी दिली असून त्यांच्या नेत्यांनी भारतावर अणुबॉम्ब हल्ल्याचा इशाराही दिला आहे.
दिल्लीतही गेल्या काही दिवसांपासूनच्या मोठ्या घडामोडी पाहता मोदी सरकारचा काहीतरी मोठा प्लॅन असल्याचं बोललं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, केंद्रीय गृहमंत्री, संरक्षणमंत्री यांच्यासोबत बैठकांचा धडाका लावला आहे.
या सगळ्या घडामोडींवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं.
संयुक्त राष्ट्र संघटनेने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
संयुक्त राष्ट्र संघानं भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचा सल्ला दिला असून लष्करी कारवाई हा उपाय नसल्याचं म्हटलं आहे. दोन्ही देशांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशांत सर्वोच्च पातळीवरचा तणाव राहिला असल्याचंही असंही संयुक्त राष्ट्रानं निरीक्षण नोंदवलं आहे.