Rashmi Mane
यूपीएससी म्हणजे देशातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षा. दरवर्षी ही परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी लाखो विद्यार्थी प्रयत्न करतात, पण यश मोजक्यांनाच मिळते. मात्र उत्तर प्रदेशातील दोन जिल्ह्यांनी देशाला सर्वाधिक IAS अधिकारी दिले आहेत. त्यामुळेच त्यांना ‘यूपीएससीची फॅक्टरी’ असे म्हणतात.
लोक सेवा आयोगाची (UPSC) परीक्षा पार करणे सोपे नाही. प्रचंड अभ्यास, शिस्त आणि सातत्य यामुळेच यश मिळते. उत्तर प्रदेशातील काही भागांनी या बाबतीत वेगळीच परंपरा निर्माण केली आहे.
पहिला जिल्हा म्हणजे जौनपूर. हा जिल्हा यूपीएससी निकालांमुळे देशभरात ओळखला जातो. येथून सर्वाधिक IAS आणि IPS अधिकारी घडले असल्याचे सांगितले जाते.
जौनपूरमधील माधोपट्टी हे छोटेसे गाव विशेष चर्चेत आहे. केवळ 75 घरांच्या या गावातून सुमारे 47 IAS आणि IPS अधिकारी तयार झाले आहेत. जवळपास प्रत्येक घरात एक तरी अधिकारी सापडतो.
जौनपूर हे लखनऊ पासून सुमारे 300 किलोमीटर अंतरावर आहे. तरीही शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी हा जिल्हा मोठे केंद्र बनला आहे.
1952 मध्ये डॉ. इंदुप्रकाश यांनी यूपीएससीमध्ये दुसरी रँक मिळवून या परंपरेची सुरुवात केली. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेत यश मिळवले. कुटुंबातील पुढील पिढ्यांनीही ही यशस्वी परंपरा कायम ठेवली.
दुसरा महत्त्वाचा जिल्हा म्हणजे प्रयागराज. या शहराला यूपीएससीचे ‘हब’ मानले जाते. येथे शेकडो विद्यार्थी दरवर्षी परीक्षा उत्तीर्ण होतात.
प्रयागराजमधील इलाहाबाद विद्यापीठ हे यूपीएससी तयारीचे प्रमुख केंद्र आहे. येथे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले अनेक विद्यार्थी एकाच वेळी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात.