Pradeep Pendhare
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण यांच्या युद्धाला आता 23 दिवस उलटून गेले आहेत. युद्धाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊन, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलर प्रति बॅरलच्या वर गेल्या आहेत.
नैसर्गिक वायूपासून बनवल्या जाणाऱ्या खत निर्मितीवर परिणाम झाला असून, खत तुटवड्याचं संकट निर्माण झालं आहे. तसंच खतांच्या अभावामुळे पिकांचं उत्पादन घटल्याने अन्नाचा तुटवडा होऊ शकतो.
युद्ध संघर्ष सुरू राहिल्यास पुढे एक ते तीन महिन्यांत ग्राहकांना अन्नधान्याच्या किंमतींवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
युद्धामुळे औषधे आणि फार्मास्युटिकल उत्पादनांच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होत आहे. औषधनिर्माण क्षेत्रातील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचं केंद्र असणाऱ्या दुबईवर हल्ला झाला आहे.
भारत जेनेरिक औषधांचा जगातील सर्वात मोठा पुरवठादार आहे आणि वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, जागतिक स्तरावर वापरल्या जाणाऱ्या लसींपैकी सुमारे 60 टक्के लसींचं उत्पादन भारतात होतं.
दुबईला जाण्यासाठी काही पर्यायी मार्ग उपलब्ध असले तरी, त्यांपैकी बहुतांश मार्गांची क्षमता मर्यादित आहे. परिणामी भविष्यात औषधांच्या किमती वाढू शकतात आणि उपलब्धता कमी होऊ शकते.
या युद्धामुळं तांब्याच्या खाणी अडचणीत आल्या असून, जगभरातील खत उत्पादकही सल्फरला पर्याय काय? याच्या शोधात आहेत.
रसायनाच्या विस्कळीत पुरवठ्यामुळे सेमीकंडक्टर आणि चिप्ससह असंख्य उत्पादनांच्या निर्मितीवर परिणाम होऊ शकतो.
स्मार्टफोन, संगणक, मेमरी कार्ड, वाहने आणि घरे, कार्यालये आणि कारखान्यांमध्ये याचा वापर होत, असल्याने सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किंमती वाढण्याची भीती आहे.