Jagdish Patil
मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊसामुळे मुंबई, पुण्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे.
अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत तर अनेक महामार्ग ठप्प झाले आहेत.
याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केलंय, तर नाशिकमध्ये ढगफुटीसदृश पावसाची शक्यता वर्तवली आहे.
याच निमित्ताने 'ढगफुटी' म्हणजे नेमकं काय? ती खरंच धोकादायक असते का ते जाणून घेऊया.
ढगफुटी ही हवामानाशी संबंधित एक घटना आहे. ज्यामध्ये कमी वेळात एखाद्या परिसरात प्रचंड पाऊस पडतो.
हवामान विभागाच्या मते, '20 ते 30 चौरस किमी. परिसरात एका तासात 100 मिमी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो त्याला ढगफुटी म्हणतात'.
'ढगफुटी'त नावाप्रमाणे ढग फुटत नाहीत, तर ही घटना वातावरणातील विशिष्ट प्रक्रियांमुळे घडून येते.
समुद्रावरून आलेली बाष्प असलेली हवा डोंगराळ भागात येते आणि पर्वतांच्या उतारांमुळे वेगाने वरच्या दिशेने ढकलली जाते.
या प्रक्रियेला 'ओरोग्राफिक लिफ्ट' म्हणतात. वर जाताच या हवेचे तापमान कमी होते आणि त्यातून मोठे ढग तयार होतात.
खालून वर जाणारी हवा ढगातील पाण्याच्या थेंबांना खाली पडू न देता पुन्हा वर ढकलते. ज्यामुळे ढग आणखी दाट होतात.
त्यामुळे ढगामध्ये पाण्याचे प्रमाण वाढते आणि काही काळाने उर्ध्वगामी वाऱ्यांचा वेग कमी होताच ढगात साचलेलं पाणी एकाच वेळी खाली कोसळते.
यामुळे कमी वेळात प्रचंड पाऊस पडतो, परिणामी जमिनीला पाणी शोषून घेण्यासाठी वेळ न मिळाल्याने त्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते.