हैदराबाद : हैदराबाद महापालिकेत सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीने (टीआरएस) सर्वाधिक जागा मिळवल्या असून, भाजपनेही मुसंडी मारली आहे. एआयएमआयएम तिसऱ्या स्थानी आहे. भाजपकडून स्वत:च्या कामगिरीचे कौतुक सुरू आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मात्र, यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.
हैदराबाद महापालिकेच्या 150 पैकी 149 जागांसाठी 1 डिसेंबरला मतदान झाले होते. एका जागेवर मतदाराचे चिन्ह चुकीचे असल्याने मतदान रद्द करण्यात आले होते. मतदारांनी आज मतदानासाठी फारसा उत्साह दाखवला नाही. मतदानाची टक्केवारी 46.55 टक्के होती. मागील महापालिका निवडणुकीत 2016 मध्ये मतदानाची आकडेवारी 45.27 टक्के होती.
महापालिकेचा निकाल काल जाहीर झाला. यात टीआरएसने सर्वाधिक 55 जागा मिळवल्या. मात्र, बहुमताच्या आकड्यापासून पक्ष दूरच आहे. भाजप 48 जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. एआयएमआयएम 44 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. महापालिकेत सत्तास्थापनेसाठी टीआरएसला दुसऱ्या पक्षाची मदत घ्यावी लागणार आहे.
महापालिकेत मिळालेल्या जागांबद्दल भाजपमध्ये उत्साह आहे. मात्र, तेलंगणमध्ये भाजपला यश मिळाल्याचा दावा ओवेसी यांनी खोडून काढला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजपने हैदराबादमध्ये सर्जिकल स्ट्राईकची भाषा केली होती. परंतु, जनतेने त्यांच्यावर डेमोक्रॅटिक स्ट्राईक केला आहे. कुठेय भाजपची हवा? भाजपची हवा असती तर महाराष्ट्रातील शिक्षक आणि पदवीधर निवडणुकात भाजपचा पराभव झाला नसता.
भाजप म्हणाला होता की ओल्ड हैदराबादमध्ये सर्जिकल स्ट्राईक करणार. परंतु, त्यांना माझ्या भागात काहीही करता आले नाही. राज्यातील जनता भाजपला विस्तारण्यापासून रोखेल, असा विश्वास मला आहे. अमित शहा आणि योगी आदित्यनाथ जिथे प्रचारासाठी गेले तिथे भाजपचा पराभव झालेला आहे, असे ओवेसी म्हणाले.
भाजपने नुकतीच डुब्बक विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची एक जागा जिंकली होती. भाजपचे उमेदवार रघुनंदन राव यांनी तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) सोलिपेटा सुजाता यांचा 1 हजार 470 मतांनी पराभव केला होता. यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला होता आणि महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली होती.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा प्रचारात उतरले होते. त्यांनी वादग्रस्त भाग्यलक्ष्मी मंदिरापासून प्रचाराचा सुरवात केली होती. हे मंदिर हैदराबादमधील प्रसिद्ध चारमिनारच्या पायथ्याशी आहे. भारतीय पुरातत्व विभागाने या मंदिराचे बांधकाम अवैध ठरवले होते. तसेच, उच्च न्यायालयानेही या मंदिराचा विस्तार करण्यास मनाई घातली होती. याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्रचार केला होता.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.