नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राम मंदिराचे निर्माण ही देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे म्हटले आहे. कोरोनासारख्या सर्वांत कठीण आव्हानाचा मुकाबला जागतिक समुदायाने आज एकजूट होऊन करण्याची आवश्यकता आहे, अशी गरजही त्यांनी व्यक्त केली. भारताचा शांततेवर विश्वास असला तरी कोणी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करेल तर त्याला भारताकडून प्रत्युत्तर मिळेल, असा इशाराही त्यांनी चीनचे नाव न घेता दिला.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपतींनी गलवान खोऱ्यांतील चीनसोबत झालेल्या संघर्षात देशासाठी हुतात्मा झालेल्या शूरवीरांचा गौरव केला, राष्ट्रपतींनी चीनचा नामोल्लेख केला नाही तरी गलवान खोऱ्याचा स्पष्ट उल्लेख करून त्यांनी इशारा दिला. ते म्हणाले की, देशाच्या सीमांचे रक्षण करताना भारत मातेच्या शूर जवानांनी प्राणार्पण केले. गलवानमध्ये बलिदान दिलेल्या त्या शूरवीरांना सारा देश सलाम करत आहे. त्यांच्या कुटुंबीयांबाबत प्रत्येक भारतीयाच्या मनात कृतज्ञता आहे. आम्हाला आमच्या सीमांचे व देशांतर्गत भागांचे रक्षण करणारे लष्कर, पोलीस, निमलष्करी दलांचा अभिमान आहे.
कोरोना संकटाचे संधीत रूपांतर करून विशेषतः छोटे व्यावसायिक-उद्योजक व शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढून अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान करण्यास आता प्राधान्य द्यायचे आहे. भारताच्या आत्मनिर्भरतेचा अर्थ स्वतः सक्षम होणे असून, जगापासून दूर राहणे नव्हे. भारत वैश्विक बाजारपेठेत सामील होतानाच स्वतःची वेगळी ओळखही कायम ठेवेल, असे राष्ट्रपतींनी सांगितले.
सर्वांच्या सुखासाठी व ‘विश्वमंगलतेसाठी’ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दु:खभाग् भवेत् अशी प्रार्थना करून राष्ट्रपतींनी संबोधनाचा समारोप केला.
नवी दिल्ली : उद्याच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी देशाला संबोधित करणार आहेत. देशातील या मुख्य सोहळ्याच्या तयारीचा सुरक्षा यंत्रणांनी आज आढावा घेतला. यंदाच्या सोहळ्यासाठी कोरोना योद्ध्यांसह चार हजार लोकांना आमंत्रित करण्यात आले असून, कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा ऐतिहासिक ठरण्याची चिन्हे आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे यंदाच्या सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंग व मास्कसह सर्व उपाययोजनांचे काटेकोर पालन करणे उपस्थितांना बंधनकारक असेल. उद्याच्या मुख्य कार्यक्रमात आमंत्रितांना रांगा लावण्याचा त्रास होऊ नये यासाठी लाल किल्ल्याच्या चौतर्फा अतिरिक्त फाटके बसविण्यात आली आहेत. सर्व ठिकाणी येणाऱ्यांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येईल. मास्क व हँड सॅनिटायजरही परिसरात ठिकठिकाणी ठेवण्यात येणार आहेत.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.