पाटणा : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्दा आता बिहारच्या रणधुमाळीत गाजू लागला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना जाहीर सभांमध्ये गोस्वामींवरील कारवाईवरुन काँग्रेसला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्रचारसभेत बोलताना या मुद्द्यावरुन काँग्रेसवर हल्लाबोल केला.
योगी आदित्यनाथ यांनी मधुबनी येथे आज जाहीर सभा झाली. या वेळी त्यांनी अर्णब गोस्वामींवरील कारवाईचा निषेध करीत काँग्रेसला धारेवर धरले. ते म्हणाले की, काँग्रेसकडून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. आधी या पक्षाने देशावर आणीबाणी लादली आणि आता देशातील एका मोठ्या पत्रकाराला केवळ आपल्या समाधानासाठी अटक केले आहे. काँग्रेसकडून देशातील चौथ्या स्तंभावर हल्ला सुरू आहे.
काँग्रेस स्वत:चे अपयश लपवण्यासाठी देशात अराजकता निर्माण करीत आहे. काँग्रेसला देशावर 55 वर्षे राज्य करण्याची संधी मिळाली. लोकशाहीचा गळा घोटण्याचा काँग्रेसचा जुना इतिहास आहे. काँग्रेसने 1975 मध्ये देशावर आणीबाणी लादली होती, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली.
इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला आहे. २०१८ मध्ये इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. त्यावेळी पोलिसांना अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते.
त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. या वर्षीच्या मे महिन्यात अन्वय यांची कन्या अज्ञा नाईक हिने हा तपास नीट झाला नसल्याची तक्रार केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी सीआयडी चौकशीचा आदेश दिला होता.
बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा काल (ता.3) झाला असून, यात ९४ मतदारसंघ होते. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.