नवी दिल्ली : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (World Economic Forum) व्यासपीठावर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे विशेष भाषण झाले. या भाषणादरम्यान अचानक टेलिप्रॉम्प्टर बंद पडल्याने मोदींचा गोंधळ उडाला. त्यामुळे त्यांना आपले भाषण अर्ध्यातच थांबवावे लागले. त्यावरून आता काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी भाषणादरम्यान कोरोनाशी (Corona) लढताना भारतीयांची इच्छाशक्ती चांगली असल्याचा उल्लेख केल्यानंतर लगेचच टेलिप्रॉम्प्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडला. त्यामुळे भाषण देत असतानाच मोदींना थांबवावे लागले. त्यामुळे काहीशा गोंधळलेल्या स्थितीत आणि थोड्या संतापलेल्या नजरेने टेलिप्रॉम्प्टरकडे पाहू लागले. त्यांनंतर त्यांनी दोन्ही हात वर करत कानात हेडफोन लावेल आणि समोरच्यांना व्यवस्थित ऐकू येत आहे का, अशी विचारणा केली. समोरून भाषण व्यवस्थित ऐकू येत असल्याचे सांगण्यात आले. पण त्यानंतर कदाचित काहीसा तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्याने आयोजकांनीही मोदींचे भाषण मध्येच थांबवत पुढील कार्यक्रमाला सुरूवात केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
टेलिप्रॉम्प्टर बंद पडल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ट्विटरवर #Teleprompter #TeleprompterPM असा ट्रेंड सुरू आहे. काँग्रेसनेही यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी 'इतना झूठ Teleprompter भी नहीं झेल पाया' असं ट्विट केलं आहे. कोरोना काळातील मृतांचा आकडा केंद्र सरकारकडून लपवला जात असल्याची टीका राहुल गांधी यांच्याकडून केली जाते. त्यावरूनच त्यांनी हा निशाणा साधल्याची चर्चा आहे.
काँग्रेसनेही (Congress) पंतप्रधानांचा व्हिडीओ ट्विट करत 'अच्छा चलता हूं, दुआवों में याद रखना' आणि 'हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था' असं म्हणत पंतप्रधान मोदींना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. पंतप्रधान मोदी टेलिप्रॉम्प्टरशिवाय एक शब्दही बोलू शकत नाहीत, असं राहुल गांधी म्हणत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसते. सोशल मीडियात पंतप्रधान मोदी व राहुल गांधी यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
जगातील सर्वात मोठे डिजिटल व्यासपीठ
पंतप्रधान मोदी भाषणादरम्यान बोलताना म्हणाले की, आज भारत जगाला विक्रमी सॉफ्टवेअर इंजिनिअर पाठवत आहे. पन्नास लाखांहून अधिक सॉफ्टवेअर डेव्हलपर्स भारतात काम करत आहे. मागील सहा महिन्यांत दहा हजारांहून अधिक स्टार्ट-अप्सची नोंद झाली आहे. 2014 पर्यंत ही संख्या मोजकीच होती. आता जवळपास 60 हजारांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. कोरोना काळात भारताने वन अर्थ, वन हेल्थ च्या व्हिजनवर चालत अनेक देशांना आवश्यक औषधांचा पुरवठा केला. लशींचा पुरवठा करून कोट्यवधी लोकांचा जीव वाचवला. भारत हा जगातील तिसरा मोठी औषध उत्पादक देश बनला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.