नवी दिल्ली : युक्रेनची (Ukraine) राजधानी कीवमध्ये (Kyiv) अडकलेल्या भारतीय नागरिकांना तिथून तातडीने बाहेर पडण्याचे आवाहन भारतीय दुतावासाकडून (Indian Embassy) करण्यात आले आहे. त्यामुळे कीवमध्ये रशियाकडून (Russia) हल्ला केला जाण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. अजूनही अनेक विद्यार्थी कीवमध्ये अडकले आहेत. पण आता भारतीय दुतावासानंच हात वर केल्यानं विद्यार्थ्यांसह त्यांच्या भारतातील (India) कुटुंबीयांचीही चिंता वाढली आहे.
युक्रेनची राजधानी कीववर रशियाकडून आक्रमण केले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशियन सैन्याचा मोठा ताफा कीवच्या दिशेने निघाला आहे. त्यानंतर मंगळवारी दुपारी बारा वाजता भारतीय दुतावासाने ट्विट करून याबाबतचे आवाहन केले आहे. 'विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांनी रेल्वे किंवा इतर कोणत्याही उपलब्ध माध्यमातून कीव सोडावे,' असं त्यात म्हटले आहे. (Russia-Ukraine War Update)
दुतावासाने हे आवाहन केले असले तरी सध्या कीवमधील स्थिती बाहेर पडण्यासाठी चांगली नसल्याचे चित्र आहे. अनेक विद्यार्थी रेल्वेस्थानकांत अडकून पडले आहेत. त्यांना स्थानिकांकडून रेल्वेमध्ये घेतले जात नसल्याचा दावा काही विद्यार्थ्यांनी केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. रेल्वे स्थानकांवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली आहे. आपल्याला इथून बाहेर काढण्याचे आवाहन विद्यार्थ्यांकडून केले जात आहे.
कीवमधील संचारबंदी सोमवारी उठल्यानंतर दुतावासाकडून विद्यार्थी व नागरिकांना रेल्वे स्थानकांकडे जाण्याचे आवाहन करण्यात आले होते. या रेल्वेगाड्यांनी युक्रेनच्या पश्चिम भागात जावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे युक्रेन व इतर देशांच्यी सीमांवर गर्दी करू नये, आहे तिथेच सुरक्षित राहावे, असंही आवाहन करण्यात आले होते. पण मंगळवारी कोणत्याही स्थितीत बाहेर पडण्याचे आवाहन दुतावासाने केल्याने संताप वाढला आहे.
संजीवनी झा हिने ट्विट करत म्हटलं आहे की, एकापाठोपाठ एक अॅव्हायझरी जारी करणं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी मदत नव्हे. त्यांना बाहेर पडण्यास मनाई असताना ते कसे बाहेर पडणारे, दुतावास त्यासाठी काही करत आहे का, असा सवाल तिने उपस्थित केला आहे. तर वाहतुकीचं कोणतंही साधन उपलब्ध नसताना विद्यार्थी कीवमधून कसे बाहेर पडतील. रेल्वे, बस उपलब्ध नाहीत. सरकारनं त्यांच्या मदतीसाठी काहीतरी करायला हवं. सुमारे एक हजार विद्यार्थी व्होकझल रेल्वे स्थानकावर अडकले आहेत. स्थानिक त्यांना रेल्वेगाड्यांमध्ये घेत नाही, असा संताप पंडिता यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, भारताने आतापर्यंत सात विमानांमधून जवळपास दीड हजार नागरिकांना मायदेशी परत आणले आहे. तसेच जवळपास आठ हजारांहून अधिक भारतीयांना युक्रेन सोडलं आहे. अजूनही अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांनी सुरक्षित शहरांमध्ये जाण्याचे आवाहन यापूर्वीच दुतावासाकडून करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच युक्रेन सरकारने पश्चिम भागात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. पण आता दुतावासाच्या आवाहनामुळे भारतीयांनाही या युध्दाचा धोका वाढल्याचे संकेत मिळत आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.